कापूस व सोयाबीनवर मंदीचे सावट
By Admin | Updated: October 27, 2014 22:44 IST2014-10-27T22:44:58+5:302014-10-27T22:44:58+5:30
कापसाची व सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दगा दिला. यात दशकातील सर्वात कमी उत्पन होत आहे. अशाच स्थितीत बाजारपेठेमध्ये कापूरस व सोयाबीन

कापूस व सोयाबीनवर मंदीचे सावट
यवतमाळ : कापसाची व सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दगा दिला. यात दशकातील सर्वात कमी उत्पन होत आहे. अशाच स्थितीत बाजारपेठेमध्ये कापूरस व सोयाबीन मंदीच्या सावाटात सापडले आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने आश्वासीत हमीभावने दोन्ही पिकांची खरेदी करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.
हमीभावापेक्षा कमी भावात व्यापारी माल घेत आहे. एकीकडे उत्पन जेमतेम ३० टक्के होत असतांना लागवडीचा खर्च दुपटीने वाढला आहे. पहिलेच कर्जबाजारी असलेले शेतकरी उपासमारीला तोंड देत आहे. अशा कठीण समयी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लागवड खर्च आणि त्यावर ५० टक्के नफा या प्रमाणे हमीभाव देऊन कापसाची व सोयाबीनची खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसून येते. विदर्भातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी भाजपला लोकसभेत व विधानसभेत खुला पाठींबा देणारे विदर्भ जन आंदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे .
जगात कापसाचे भाव प्रती पौंड १३४ सेंट वरून ६६ सेंटवर आले आहे. चीनसुद्धा भारताच्या कापसाची आवक ५० टक्के कमी करणार या मंदीच्या वातावरणात विदर्भातील कापुस उत्पादक शेतकरी नडला जाणार आहे. दोन महिन्यात विदर्भात ३०० च्या वर तर यावर्षी ९०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मागील लोकसभेत महायुतीने लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव व संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली होती. मात्र आज कोणताही नेता यावर बोलत नाही यामुळे शेतकरी फसवल्यागेल्या सारखे झाले आहे. मोदींनी तत्काळ महाराष्ट्राच्या शेती संकटावर दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी तिवारी यांनी केली आहे.
सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे. तर कापसाची बोंडे गळून पडली आहे. या परिस्थितीतून वाचण्यासाठी शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन यावरही पाणी फेरत आहे, निसर्ग प्रकोप शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. उशिरा आलेल्या पावसाने पेरणी उशिरा झाली.
सर्वाधिक फटका बसला तो सोयाबीनला व कापूस या नगदी पिकाला मात्र पावसाचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे आधीच कुपोषित असलेले पीक रोगाला बळी पडले. शेंगा हिरव्या अवस्थेत असतानाच सोयाबीनची पानगळ झाली. सोयाबीनच्या झाडाला पाने नाही आणि अपरिपक्व शेंगा दिसत आहे.
अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे, मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकऱ्यांना पंतप्रधानांनीच मदतीचा हात द्यावा, अशी आशा मागणी विदर्भ जनआंदोलन समितीकडून करण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)