दिग्रसच्या नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:05+5:30
मुंबईवरुन परतलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पुसद तालुक्यातील बाधिताच्या संपर्कात आल्याने सुरुवातीला चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दारव्हा येथील महिलेच्या संपर्कातील दोन जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्या सहावर पोहोचली होती. गुरुवारी एक व शुक्रवारी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या आता दहावर पोहोचली आहे.

दिग्रसच्या नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहर व तालुक्याची रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. त्यामुळे दिग्रसकरांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.
मुंबईवरुन परतलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पुसद तालुक्यातील बाधिताच्या संपर्कात आल्याने सुरुवातीला चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दारव्हा येथील महिलेच्या संपर्कातील दोन जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्या सहावर पोहोचली होती. गुरुवारी एक व शुक्रवारी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या आता दहावर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता पुसदचे उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार राजेश वजीरे, मुख्याधिकारी शेषराव टाले, ठाणेदार सोनाजी आमले, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णराज बानोत यांनी बैठक घेऊन कोरोनावर मात करण्याची रणनीती ठरविली. या बैठकीत उपाययोजनांवर खल करण्यात आला. त्यांच्या चर्चेत शहरातील काही राजकीय पदाधिकारी आणि व्यापारीसुद्धा सहभागी झाले. शहरातील अनेक परिसर सील करण्यात आले आहे. या परिसरावर यंत्रणेचे बारकाईने लक्ष आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून प्रशासन दक्षता घेत आहे. मात्र प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. अन्यथा पुढील काळात शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. शहरात सील परिसरात प्रशासनाने आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.
२९ जून ते ५ जुलैपर्यंत शहर बंद
प्रशासन, राजकीय पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत २९ जून ते ५ जुलैपर्यंत शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागरिक घराबाहेर पडणार नाही. परिणामी कोरोना संसर्गाला आळा घालण्यास मदत होईल. नागरिकांनी आठवडाभर घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले. मात्र या बंदमधून अत्यावश्यक सेवांना सूट दिली आहे.