शासकीय कार्यालयातील अनियमिततेने नागरिक त्रस्त
By Admin | Updated: January 11, 2015 22:57 IST2015-01-11T22:57:28+5:302015-01-11T22:57:28+5:30
शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. अनेक प्रकरणे तुंबली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

शासकीय कार्यालयातील अनियमिततेने नागरिक त्रस्त
उमरखेड : शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. अनेक प्रकरणे तुंबली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एकाएका कामासाठी आठ ते १० दिवस उंबरठे झिजवावे लागतात.
उमरखेड येथे तहसील, पंचायत समिती, कृषी, भूमीअभिलेख, आरोग्य आदी विविध कार्यालये आहेत. याठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नुकतेच उमरखेडला उपविभागीय महसूल कार्यालयही उघडण्यात आले आहे. परंतु कोणत्याच कार्यालयातील अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक नसल्याचे दिसून येते. याचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सोसावा लागतो.
तहसीलमध्ये अतिक्रमणाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. निराधार दररोज तहसीलमध्ये येरझारा घालत आहेत. विविध दाखले आणि अन्नपुरवठा विभागातही सावळा गोंधळ सुरू आहे. ठरलेल्या कालावधीत कोणतेच काम होताना दिसत नाही. महसूल अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ मंडळ अधिकारी आणि तलाठी शोधूनही सापडत नाही. अशीच स्थिती पंचायत समिती कार्यालयाची आहे. घरकुल योजनेच्या लाभासाठी अनेक नागरिक पंचायत समितीत येतात. परंतु कुणीही जाग्यावर भेटत नाही. पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातही मोठी अनागोंदी दिसून येते. आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरातच भटकताना दिसतात. यामुळे लसीकरणासह अनेक कामे खोळंबली आहे.
कृषी विभागाच्या कारभारापुढे तर शेतकऱ्यांनी हात टेकले आहे. मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक शेताच्या धुऱ्यावर दिसत नाही. उलट उमरखेडमध्ये दुचाकी घेऊन भटकताना दिसतात. शेतकऱ्यांच्या अडचणी ते कशा सोडवित असतील हा चिंतनाचा विषय आहे. तालुका भूमी अभिलेख हा सर्वांना निगडीत असलेला विभागही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेने नागरिकांची कामेच होत नाही. त्यामुळे ढाणकी, बिटरगाव, दराटी, मुळावा, पोफाळी या भागातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करीत आहे. (शहर प्रतिनिधी)