सीईओंचा थर्टी फर्स्ट जळकात
By Admin | Updated: January 3, 2015 02:13 IST2015-01-03T02:13:49+5:302015-01-03T02:13:49+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मारेगाव तालुक्यातील जळका ग्रामपंचायतीमध्ये ३१ डिसेंबरला रात्री ९ ते १ जानेवारीला पहाटे १.३० वाजेपर्यंत ....

सीईओंचा थर्टी फर्स्ट जळकात
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मारेगाव तालुक्यातील जळका ग्रामपंचायतीमध्ये ३१ डिसेंबरला रात्री ९ ते १ जानेवारीला पहाटे १.३० वाजेपर्यंत ग्रामसभा घेऊन तसेच ग्रामविकासाचा आराखडा तयार करून नववर्षाचे स्वागत ग्रामस्थांसोबत केले.
यावेळी त्यांच्यासोबत महात्मा गांधी नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत भावसार, सुलभ सामाजिक संस्थेचे पंढरी पांडे, गटविकास अधिकारी गिरासे, गटशिक्षणाधिकारी जी.एस. खोले, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा समन्वयक महेंद्र गुल्हाने, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रणमले, पी.डी. पंडित, कृषी अधिकारी निलगिलवार, शाखा अभियंता ठाकरे, हिरडे उपस्थित होते.
जळका ही आदिवासी, पेसा ग्रामपंचायत आहे. ३१५ कुटुंब असलेल्या या गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०११ मध्ये ही ग्रामपंचायत निर्मलग्राम पुरस्कृत झालेली आहे. तसेच तंटामुक्त ग्राम पुरस्कार, विकासरत्न पुरस्कार मिळालेले हे गाव आहे. परंतु अद्यापही अनेक समस्या येथे बाकी आहे. हीच बाब हेरून मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी सीईओंनी या गावाची निवड केली.
यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, घरकूल, शौचालय, बचत गट आदी बाबींवर ग्रामस्थांशी प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून चर्चा केली. तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. या सभेत ग्रामस्थांनी पांदण रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी, वाचनालय, व्यायामशाळा साहित्य, पाझर तलावाचे खोलीकरण आदी सुविधा व कामांची मागणी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ नियोजन करून कामाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तत्पूर्वी डॉ.कलशेट्टी यांचे गावात रात्री ९ वाजता आगमन झाल्यानंतर सरपंच हिरामण टेकाम, उपसरपंच तुळसाबाई वेट्टी, तुळीराम कुमरे, हंसराज मोेघे, नितीन खडसे, संजय हडसन, उषाताई खडसे, नारायण खडसे आणि राजेश ढगे यांनी स्वागत केले. कलापथकाद्वारे जनजागृतीनंतर ग्रामपंचायतीच्या प्रशस्त प्रांगणात रात्री १.३० वाजेपर्यंत ग्रामसभा घेण्यात आली.सर्व अधिकाऱ्यांनी गावात जेवण घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातच मुक्काम केला. जिल्ह्याच्या इतिहासात बहुधा सीईओंनी अशा प्रकारे ग्रामसभा घेऊन व ग्रामविकासाचा आराखडा तयार करून कुण्या गावात मुक्काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला सकाळी ७ वाजता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात फिरून घरकूल बांधकाम, रस्ते, नाला, शौचालय बांधकाम, पाणीपुरवठ्याची विहीर आदींची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत भावसार, गटविकास अधिकारी आर.के. गिरासे, गटशिक्षणाधिकारी खोले, विस्तार अधिकारी पंडित, रणमले, महेंद्र गुल्हाने आदी उपस्थित होते. येथील ग्रामपंचायतीला आदर्श करण्याच्या संकल्पासह सकाळी ९.३० वाजता हा सर्व अधिकाऱ्यांचा ताफा यवतमाळकडे परतला. (प्रतिनिधी)
नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्य
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्यासोबत खाली बसून चर्चा करत आहेत, समस्या विचारीत आहेत आणि जेवण करून ग्रामपंचायतमध्येच मुक्कामसुद्धा ठोकत आहेत, या सर्वच बाबी ग्रामिण नागरिकांसाठी उत्सुकतेचा आणि आश्चर्याचा विषय होता. आजा शासनाच्या विभागातील तलाठी, लिपिकसुद्धा सामान्य माणसांची समस्या ऐकूण घेण्यास तयार नसताना सीईओंना आपल्या विकासाबाबत असलेली तळमळ पाहून गावकऱ्यांना सुखद धक्का बसला. प्रशासनात असा अधिकारी असू शकतो, हे आम्हाला माहीत नव्हते, अशीच ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली. मावळत्या वर्षाला निरोव व नवीन वर्षाची सुरवात एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत साजरी करता आली, याचे अप्रुप गावकऱ्यांमध्ये दिसून येते.