वणी तालुक्यात पुन्हा बोंडअळीचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:04+5:30

वणी तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र कापूस फुटण्याच्या काळातच या भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. मुळात परतीच्या पावसामुळे कपाशीवर फवारणी करणे गरजेचे होते.

Bondali outbreak again in Wani taluka | वणी तालुक्यात पुन्हा बोंडअळीचा उद्रेक

वणी तालुक्यात पुन्हा बोंडअळीचा उद्रेक

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा परिणाम : शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कापसाचे बोंड पोखरून खाणाºया गुलाबी अळीचा पुन्हा एकदा वणी तालुक्यात प्रकोप झाल्याने शेतकरी हादरले आहेत. सरासरी दोन वेचे झाल्यानंतरही कपाशीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर बोंड असून ही बोंडअळी आता सर्व कापसाचे पीक उद्ध्वस्त करण्याची भीती निर्माण झाली आहे.
वणी तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र कापूस फुटण्याच्या काळातच या भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. मुळात परतीच्या पावसामुळे कपाशीवर फवारणी करणे गरजेचे होते. परंतु कापसाची वेचणी करायची की फवारणी करायची, या द्विधा मनस्थितीत शेतकऱ्यानी कापसाची वेचाई करणेच पसंत केले. त्यामुळे फवारणी मागे पडली. परिणामी आठ दिवसांपूर्वी वणी तालुक्यात गुलाबी बोंडअळीने ‘दस्तक’ दिला. ही बोंडअळी वेगाने पसरत असून जवळपास सर्वच शेतांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या अळीने आक्रमण केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ला दिली. मागीलवर्षीदेखील याच काळात गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. यंदा दोन वेचापर्यंत अतिशय उत्तम प्रतिचा कापूस शेतकऱ्याच्या हाती आला. त्याला सीसीआयकडून भावही चांगला मिळाला. तोवर गुलाबी बोंडअळीचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होईल, या अपेक्षेत शेतकरी होता. परंतु आठ दिवसांपूर्वी बोंडअळीचा शिरकाव होऊन ही बोंडअळी वेगाने कपाशीवर अतिक्रमण करित असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे सरासरी २५ टक्के फटका बसण्याची भीती आनंद बदखल यांनी बोलून दाखविली.
बोंडअळीला रोखण्यासाठी वेळोवेळी फवारणी करण्याची गरज असते. परंतु परतीच्या पावसाने घातलेला धुमाकुळाने शेतकऱ्याना फवारणी करण्याची उसंतच दिली नाही. परिणामी याच काळात बोंडअळ्यांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली. बी.टी.बियाणांवर किमान १०० दिवस व्यवस्थित संगोपन केल्यास कपाशीला कोणताही धोका नसतो. परंतु १०० दिवसानंतर हाच बी.टी.कापूस सर्वसाधारण कापूस होतो. यातील बी.टी.चे जिवाणू नैसर्गीकरित्या नष्ट होतात. त्याचमुळे रोगांच्या आक्रमणाची भीती निर्माण होते. यंदाही नेमके तेच झाले आहे. कापसावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकºयांना लाखोचा फटका बसणार आहे.

कृषी विभाग म्हणतो, कपाशी नष्ट करा
कृषी विभागाच्या मते मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचे आक्रमण झाले असून तिला थोपवणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ओलित आहे, त्यांनी तातडीने कपाशीचे पीक नष्ट केले पाहिजे. त्यामुळे पुढीलवर्षी बोंडअळीपासून दिलासा मिळू शकतो.

Web Title: Bondali outbreak again in Wani taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी