घाटंजीच्या विकासाला खीळ
By Admin | Updated: August 10, 2015 02:15 IST2015-08-10T02:15:03+5:302015-08-10T02:15:03+5:30
शहरात प्रलंबित असलेल्या विकास कामांची यादी लांबलचक आहे. मात्र आर्थिक मलिदा मिळणाऱ्या कामांकडेच नगरसेवकांचे लक्ष असून, इतर कामांवर दुर्लक्ष केले जात आहे.

घाटंजीच्या विकासाला खीळ
नगरसेवकांचे दुर्लक्ष : केवळ मलिदा मिळणाऱ्या कामांवरच जोर
घाटंजी : शहरात प्रलंबित असलेल्या विकास कामांची यादी लांबलचक आहे. मात्र आर्थिक मलिदा मिळणाऱ्या कामांकडेच नगरसेवकांचे लक्ष असून, इतर कामांवर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.
नगरपरिषद कार्यालयात गेल्यानंतर नगराध्यक्षांचे एकच तुणतुणे ऐकायला मिळते, ते म्हणजे ‘माझे कुणीही ऐकत नाही, त्याला मी काय करू?’, माझे किती, तुझे किती यावरच सातत्याने खल सुरू असतो. मार्च एन्डींगच्या सुमारास कोट्यवधी रुपये परत गेले. जी कामे झाली ती केवळ ठेकेदारांच्या नावावर घेतल्या गेलेली कामे होती. तीही नगरसेवकांनी स्वत:च वाटून घेतली होती. पूर्वी कामाचे कामिशन नगरसेवक स्वत:च्या खिशात टाकायचे. परंतु, आता ठेकेदाराला कमिशन देऊन कामे नगरसेवकच करतात.
अशावेळी संबंधित कामाचा दर्जा कोण तपासणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
नगरपरिषदेचे अभियंतेही राजकीय दबावाखाली बांधकामाची गुणवत्ता तपासत नाही. डोळे मिटून बिल काढले जाते. मुख्याधिकारीही सतत दडपणाखाली वावरतात. त्यामुळे त्यांनीही बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहे.
मागील वर्षी सिमेंट काँक्रीट रोड व नाल्या तसेच रिटेनिंग वॉलच्या कामात भ्रष्टाचार झाल्याबाबत नगरपरिषदेकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. वरिष्ठांनी या तक्रारींची दखल घेऊन कामांच्या दर्जाची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात आवश्यक असलेल्या कामांकडे नगरसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शहराचा मुख्य रस्ताच प्रचंड उखडलेला आहे. त्यातून अपघातही वाढलेले आहे. अपघातामध्ये आतापर्यंत दोन जीवही गेले. परंतु रस्त्याची निविदा काढून बराच कालावधी लोटला तरी ‘सेटिंग’ न जुळल्याने काम सुरू झालेले नाही. या रस्त्याबाबत नागरिकांमधून ओरड वाढत आहे. मात्र नागरिकांच्या आक्रोशालाही नगरसेवक किंमत देईनासे झाले.
घाटंजी शहराला वाघाडी धरणावरून पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. फुटलेल्या पाईपलाईनमधून अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. घनकचरा व्यवस्थापनावर लाखो रुपयांचा ठेका दिल्या गेला, परंतु प्रकल्प नेमका कुठे आहे याचा नागरिकांना पत्ता लागू शकला नाही. कचरा उचलण्याचे कंत्राट एकदम तिपटीने कसे काय दिले?, वृक्ष लागवडीचा निधी, पावसाळी कामासाठी आलेला आकस्मिक निधी, रोगराई निर्मूलनासाठी फवारणी यंत्रे खरेदी व दुरूस्ती तसेच इतर किरकोळ बाबींवरील पैसा जातो कुठे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)