२० लाखांच्या साहित्याचे ‘भजन’
By Admin | Updated: December 27, 2014 22:59 IST2014-12-27T22:59:03+5:302014-12-27T22:59:03+5:30
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने सेस फंडातून २० लाखांचे भजनी साहित्य खरेदी केले. या खरेदी साहित्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने साहित्य पुरवठादारास परत केले. मात्र त्यानंतर पुन्हा

२० लाखांच्या साहित्याचे ‘भजन’
जिल्हा परिषद : परत गेलेले निकृष्ट साहित्य पुन्हा आलेच नाही
यवतमाळ : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने सेस फंडातून २० लाखांचे भजनी साहित्य खरेदी केले. या खरेदी साहित्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने साहित्य पुरवठादारास परत केले. मात्र त्यानंतर पुन्हा साहित्याच आले नाही, भजनी साहित्य खरेदीतच ‘भजन’ जमविल्याचा आरोप होत आहे.
समाजकल्याण विभागाकडून गावातील भजनी मंडळाला साहित्य देण्याची योजना राबविली जाते. या योजनेतून तबला संच, पेटी, चार टाळ जोड दिले जाते. २०१२-१३ या आर्थिक वर्षात तब्बल २०० भजनी साहित्य संच खरेदी करण्यात आले. यावर २० लाख रूपये जिल्हा परिषदेने खर्च केले. मात्र पुरवठादाराने दिलेल्या पेटीतून सुरच निघाला नाही, तर तबल्यावर थाप बसताच तबला फाटला. अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य आल्याच्या तक्रारी पंचायत समितीस्तरावरून प्राप्त होऊ लागल्या. सोबतच जिल्हा परिषद सदस्यांनीसुध्दा सभागृहात हाच मुद्दा लावून धरला. त्यानंतर हे साहित्य परत करून नवीन दर्जेदार साहित्य पुरवठा करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने पुरवठादारासमोर ठेवला. प्रत्यक्षात मात्र दोन वर्ष लोटूनही नवीन साहित्यच आले नाही.
पध्दतशीरपणे भजनी साहित्याचा मुद्दा विस्मृतीत टाकण्यात आला. यावरून भजनासाठी आणलेल्या साहित्य खरेदीतूनच भजन जमविल्याची चर्चा रंगत आहे. समजाकल्याणच्या अधिकाऱ्यांकडेही याचे उत्तर नाही. पुरवठादाराने साहित्य दिलेच नाही, अशी सबब सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे. एवढे मोठे साहित्य आलेच नाही यावर सदस्य सुध्दा गप्प आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)