रक्तदानाने जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवाची सुरूवात
By Admin | Updated: January 10, 2015 02:08 IST2015-01-10T02:08:24+5:302015-01-10T02:08:24+5:30
जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन करण्यात आले. या महोत्सवातील सर्व अनाठायी खर्चाला कात्री लावून ....

रक्तदानाने जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवाची सुरूवात
यवतमाळ : जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन करण्यात आले. या महोत्सवातील सर्व अनाठायी खर्चाला कात्री लावून ती रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शुक्रवारी येथील नेहरू स्टेडियमवर सकाळी १० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वत: रक्तदान करून महोत्सवाचे उद्घाटन केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सभापती सुभाष ठोकळ, नरेंद्र ठाकरे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे, कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण मोहोड, हरीभाऊ राऊत उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या दैनंदिन कामात नवचैतन्य निर्माण व्हावे या हेतूने ९ ते ११ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये १६ पंचायत समितीमधून १ हजार ६०० खेळाडू सहभागी होत आहेत. स्पर्धेत ५२ क्रीडा प्रकार असून, सात सांस्कृतिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सोबत प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, प्रकल्प संचालक विनायक ठमके यांच्यासह ५५ पुरूष व ११ महिलांनी रक्तदान केले. यामध्ये सोनटक्के या अंध कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
या उद्घाटन सोहळ््यानंतर सांघीक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. पुरूषांच्या कबड्डी सामन्यात दारव्हा पंचायत समिती विरुद्ध बाभूळगाव पंचायत समिती अशी लढत झाली. यात दारव्हा संघाने आठ गुणांनी विजय मिळविला. हॉलीबॉलच्या पास खेळात झरी संघाने कळंब संघावर मात केली. आर्णी संघाने दिग्रस संघाचा २-० असा पराभव केला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात पुरूषांच्या ४०० धावण्याच्या शर्यतीत नितीन डहाके (दिग्रस) यांनी प्रथम तर गोपाल महिंद्रे (उमरखेड) दुसरा क्रमांक मिळविला. भालाफेकमध्ये अनिल मडावी वणी प्रथम तर मारेगावचे राजीव कुटे व्दितीय विजेते ठरले. महिला गटात अल्का लोणकर कळंब प्रथम तर रंजना मुक्कावार यवतमाळ व्दितीय विजेता ठरल्या. थाळीफेकमध्ये सखाराम बरकडे प्रथम तर मोहन हेमणे (पांढरकवडा) यांनी दुसरा क्रमांक मिळविला. महिला गटात आरती कुमरे (घाटंजी) प्रथम तर ज्योती वरघने (यवतमाळ) यांनी दुसरा क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी व प्रास्ताविक क्रीडा सचिव सुभाष धवसे व दिलीप चौधरी यांनी केले. (क्रीडा प्रतिनिधी)
स्पर्धा आयोजनात खर्चाला कात्री
महसूल विभागाने क्रीडा स्पर्धा रद्द करून स्पर्धा आयोजनाचा खर्च दुष्काळ निधीला दिली. जिल्हा परिषद कर्मचारी संघाने मात्र स्पर्धा रद्द न करता खर्चात काटकसर करून उर्वरित निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत सहभागी सर्वच खेळाडूंना दररोज भोजन देण्याऐवजी केवळ परगावच्या खेळाडूंनाच यावेळी भोजन राहणार आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रमात व्यावसायिक कलाकारांना न बोलविता केवळ कर्मचाऱ्यांच्याच कला गुणांना यावेळी वाव दिला जाणार आहे.