‘त्या’ नेत्याचे दुसरे प्रकरणही झाले उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:15 IST2018-05-12T00:15:52+5:302018-05-12T00:15:52+5:30
तालुक्यातील तिरझडा येथील एका वृद्धेला रेल्वे भूसंपादनात मिळालेली रक्कम हडप केल्याच्या तक्रारीवरुन तीन राजकीय नेत्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तालुक्यातीलच घोटी येथील नागरिकांचेही त्यांनी लाखो रुपये हडप केल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

‘त्या’ नेत्याचे दुसरे प्रकरणही झाले उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील तिरझडा येथील एका वृद्धेला रेल्वे भूसंपादनात मिळालेली रक्कम हडप केल्याच्या तक्रारीवरुन तीन राजकीय नेत्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तालुक्यातीलच घोटी येथील नागरिकांचेही त्यांनी लाखो रुपये हडप केल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
तिरझडा येथील वृद्धा राधाबाई नेहारे यांचे चापर्डा शिवारात शेत होते. ते रेल्वेने संपादित केली. त्यापोटी त्यांना २७ लाख ८७ हजार २८५ रुपये मोबदला देण्यात आला. ही रक्कम वारसांमध्ये वाटप करुन देतो, अशी बतावणी करुन विलास मुके, अजय कारमोरे व संदीप कारमोरे यांनी कोऱ्या धनादेशावर राधाबाईची स्वाक्षरी व अंगठे घेतले. त्यांच्या खात्यातून लाखो रुपये स्वत: व इतरांच्या खात्यात वळते करुन पैसे हडपले. हा प्रकार लक्षात येताच गणेश गोसावी नेहारे यांच्या तक्रारीवरुन ३० एप्रिल रोजी विविध कलमान्वये या तिाांविरूद्ध कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच घोटी येथील काहींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. राधाबाई नेहारे यांचे घोटी येथे नातेवाईक आहे. विलास मुके याने त्यांच्याजवळूनही लाखो रुपये हडप केल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. या त्रिकुटाने आणखी कुठे-कुठे ‘हात’ मारला, याचा तपास सुरू आहे. काही पुरावे पोलिसांच्या ‘हाती’ लागले असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत यांनी दिली. य प्रकरणात बँकेचे अधिकारी तर सहभागी नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
आरोपींची जामिनासाठी धावपळ
या प्रकरणातील तिनही आरोपी सध्या पोलीस दप्तरी फरार आहे. पोलिसांना अद्याप ते गवसले नाही. आता तिघांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र पोलिसांनी जामिनीला विरोध केला आहे. काही आरोपी राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे तर या प्रकरणात त्यांना गजाआड करण्यात विलंब होत नाही ना, अशी शंका वर्तविली जात आहे.