‘अमृत’ पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST2021-09-17T05:00:00+5:302021-09-17T05:00:21+5:30

फिल्टर प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य तीन टाक्या बांधून पूर्ण झाल्या असून दोन टाक्यांची चाचणी यशस्वी झाली आहे. १६ टाक्यांचे कामही पूर्ण झाले आहे. शहरातील पाइपलाइनचे काम लवकरच होणार आहे. त्यासाठी तीन झोन तयार केले असून सध्या दोन झोनचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. यवतमाळकरांची या रखडलेल्या कामामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन आता हा प्रकल्प मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे संदीपान भुमरे यांनी सांगितले.

‘Amrut’ water supply scheme will be completed in two months | ‘अमृत’ पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण करणार

‘अमृत’ पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेली अमृत योजना चार वर्षांपासून रखडलेली आहे. या योजनेसाठी शहराच्या विविध भागांत खड्डे खोदले असून हे खड्डे शहरवासीयांच्या जीवावर उठले आहेत. नुकताच एका नागरिकाचा खड्ड्याने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना विचारले असता योजना रखडल्याचे मान्य करतानाच पुढील दोन महिन्यांत ही योजना पूर्ण करून दाखवू, असा शब्द त्यांनी दिला. योजनेच्या पूर्णत्वासाठी वाढीव मनुष्यबळासह यंत्रसामग्री पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
फिल्टर प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य तीन टाक्या बांधून पूर्ण झाल्या असून दोन टाक्यांची चाचणी यशस्वी झाली आहे. १६ टाक्यांचे कामही पूर्ण झाले आहे. शहरातील पाइपलाइनचे काम लवकरच होणार आहे. त्यासाठी तीन झोन तयार केले असून सध्या दोन झोनचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. यवतमाळकरांची या रखडलेल्या कामामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन आता हा प्रकल्प मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे संदीपान भुमरे यांनी सांगितले.
यवतमाळ नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार पूर्णत: विस्कटला होता. यावर उपाय म्हणून कार्यक्षम मुख्याधिकारी तेथे नियुक्त केले आहे. लवकरच शहरातील स्वच्छतेसह पालिकेची इतर यंत्रणाही सुरळीत होईल, असे भुमरे यांनी सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था गंभीर बनली आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. रस्ते दुरुस्तीसह रखडलेल्या रस्त्यांची कामे व्हावी, यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. 

वरिष्ठ घेणार आघाडीचा निर्णय
- जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संभाव्य निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढविणार काय, याबाबत विचारणा केली असता हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे भुमरे यांनी सांगितले. हा निर्णय घेताना शक्यतांची पडताळणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

मजीप्राच्या यंत्रणेकडे लक्ष
- बेंबळा पाणीपुरवठा योजनेचे काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कंत्राटदाराच्याच दावणीला आहे. आता पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर मजीप्राची यंत्रणा किती कार्यतत्पर होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
 

 

Web Title: ‘Amrut’ water supply scheme will be completed in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी