पुसदच्या २१३६ भटक्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:16+5:30
जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शाखेचे निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर आदींच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेच्या १४ कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू केली.

पुसदच्या २१३६ भटक्यांवर कारवाईचा बडगा
प्रकाश लामणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. मात्र नियम मोडून विनाकारण गावात फिरणाºया नागरिकांमुळे धोका वाढत आहे. अखेर अशा २१३६ भटक्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत चार लाख २८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.
जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शाखेचे निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर आदींच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेच्या १४ कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू केली. छत्रपती शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, सुभाष चौक, महात्मा गांधी चौक, नाईक चौक, श्रीरामपूर परिसर आदी भागात कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ट्रीपल सीट, विना परवाना वाहन चालविणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, डबलसीट वाहन चालविणे, संचारबंदी असूनही विनाकारण रस्त्यावर भटकणे आदी बाबींसाठी २१३६ नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार लाख २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विनाकारण फिरणाºयांमध्ये या मोहिमेने वचक निर्माण झाला आहे.
मास्क टाळणारे ३४६ जण सापडले
कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क टाळणाºयांविरुद्ध नगरपरिषदेने कारवाई सुरू केली आहे. २० एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत ३४६ जणांवर कारवाई करून एक लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, नायब तहसीलदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनात अविनाश अर्धापूरकर, प्रशांत देशमुख, राजेश पवार, धर्मेंद्र ठाकूर आदींनी ही धडक मोहीम राबविली. मास्क न वापरणाऱ्या ३३ जणांकडून ६६००, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २८७ जणांकडून ५७ हजार ४०० रुपये तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २६ व्यापाऱ्यांकडून ५६ हजार रुपये वसूल करण्यात आले.
कोरोना संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही सुरुच राहील.
- डॉ. व्यंकट राठोड
उपविभागीय अधिकारी, पुसद.