मुक्कामी कर्मचाऱ्यांना हलविले
By Admin | Updated: May 25, 2017 01:18 IST2017-05-25T01:18:03+5:302017-05-25T01:18:03+5:30
जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या मुक्कामी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदलीचा फटका बसला.

मुक्कामी कर्मचाऱ्यांना हलविले
जिल्हा परिषद : काहींची न्यायालयात धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या मुक्कामी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदलीचा फटका बसला. त्यांना नवीन जागी तत्काळ रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरवर्षी मे महिन्यात बदल्यांचा पोळा फुटतो. त्यात सामान्य कर्मचाऱ्यांचा बळी जातो. मात्र काही महाभाग कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी, एकाच टेबलवर ठाण मांडून असतात. बदली झाली तरी अधिकारी, पदाधिकाऱ्यांशी गोडीगुलाबीने वागून ते आपली तेथेच प्रतिनियुक्ती करवून घेतात, असा अजावरचा अनुभव आहे. मात्र यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
सामान्य प्रशासन विभागात काही कर्मचारी ठाण मांडून बसले होते. यावेळी त्यांना प्रशासकीय बदलीचा चांगलाच फटका बसला. यात पाच अधीक्षक, दोन कक्ष अधिकारी, चार विस्तार अधिकारी, १४ वरिष्ठ सहायक आणि तब्बल ४१ कनिष्ठ सहायकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. या सर्वांची विविध पंचायत समितींमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला.
शिक्षकांच्या बदल्यांकडे लक्ष
न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिल्याने शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाही. त्या होणार की नाही, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. तथापि संभाव्य बदल्यांच्याविरोधात काही संघटनांनी मोर्चाची तयारी सुरू केली. प्रशासनानेही बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तयार करण्यास सुरूवात केली. यात एकाच पंचायत समितीत सलग १० वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहे. दुसरीकडे बांधकाममधील काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन बदलीला आव्हान दिले आहे.