७५० अतिक्रमणे उद्ध्वस्त

By Admin | Updated: January 10, 2015 02:03 IST2015-01-10T02:03:32+5:302015-01-10T02:03:32+5:30

शहरात जिल्हा प्रशासनाने पाच दिवस राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला.

750 devastated infiltration | ७५० अतिक्रमणे उद्ध्वस्त

७५० अतिक्रमणे उद्ध्वस्त

यवतमाळ : शहरात जिल्हा प्रशासनाने पाच दिवस राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. गत पाच दिवसात ७५० दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली. पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. नेताजी मार्केटमधील नेताजी भवन हटविताना काही काळ तणाव निर्माण झाला होता.
यवतमाळ नगरपरिषद, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, दूरसंचार विभाग, पोलीस आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला ३ जानेवारीपासून प्रारंभ झाला. आर्णी राज्य मार्गावरील अतिक्रमण पहिल्या दिवशी हटविण्यात आले. त्यानंतर धामणगाव मार्ग, गोदनी मार्ग, बसस्थानक चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेट बँक चौक आदी ठिकाणचे अतिक्रमण गत पाच दिवसात हटविण्यात आले. ७५० दुकाने भूईसपाट करण्यात आली. तर १२० दुकाने जप्त करण्यात आली. त्यात लोखंडी फलक, खांब, टिनपत्रे आदींचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील मोहिमेच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. नेताजी चौक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी रस्त्याच्या चारही बाजूने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. नागपूर मार्गावरील वाहतूक शहरातून वळविण्यात आली. तहसील चौक ते बसस्थानक चौकादरम्यान फुटपाथवरील दुकाने बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता नेताजी भवनसमोर बुलडोझर पोहोचला.
त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल उपस्थित होते. तेथे उपस्थितांनी या मोहिमेच्या विरोधात नारेबाजी केली. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. काही वेळातच नेताजी भवनही उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी कारागृहासमोर काही वेळ रस्ता रोको आंदोलन केले. (शहर वार्ताहर)
पुन्हा अतिक्रमण झाल्यास फौजदारी- जिल्हाधिकारी
अतिक्रमण हटविले गेले, ते पुन्हा होऊ नये म्हणून नगरपरिषद व बांधकाम विभागाचे संयुक्त भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. हटविलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्यास एकदा संधी म्हणून ते काढून नेले जाईल. मात्र त्यांनतर पुन्हा असा प्रयत्न झाल्यास संबंधिताविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशावरून ही मोहीम असून त्याचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. आता दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाईल, असे महिवाल म्हणाले.
जिल्हाधिकारीही उतरले मोहिमेत
यवतमाळ शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल स्वत: उपस्थित होते. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार अनुप खांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक बाबासाहेब जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी दीपककुमार मीना, प्रकाश कोळसे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
पोलीस वाहनावर दगडफेक
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना बसस्थानक चौक परिसरात पीसीआर युनिटची पोलीस जीप (क्र. एम.एच.२६-आर-५६१) पेट्रोल पंपापुढे होती. यावेळी विकास मेलके रा. बांगरनगर या तरुणाने नारेबाजी करीत वाहनावर दगडफेक केली. त्यामध्ये वाहनाच्या काचा फुटल्या. सुर्दैवाने वाहनात कुणीही नव्हते. त्यामुळे इजा झाली नाही. घटनेनंतर या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी विकास मेलके याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

Web Title: 750 devastated infiltration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.