६८ गावांमधील पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:02 IST2018-03-03T22:02:22+5:302018-03-03T22:02:22+5:30

वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्याच्या ६८ गावातील नळ योजनेची वीज तोडण्यात आली आहे. गावातील पाण्याचे इतर स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.

68 water logged off | ६८ गावांमधील पाणी बंद

६८ गावांमधील पाणी बंद

ठळक मुद्देवीज तोडली : नेर तालुक्यात दीड कोटी थकीत, भटकंती सुरू

ऑनलाईन लोकमत
नेर : वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्याच्या ६८ गावातील नळ योजनेची वीज तोडण्यात आली आहे. गावातील पाण्याचे इतर स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. लोकांकडे असलेली कराची रक्कम वसूल करण्यात ग्रामपंचायतीकडून झालेली दिरंगाई यामुळेच हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
विद्युत कंपनीच्या नेर व लाडखेड विभागात ७१ गावांमध्ये नळयोजना कार्यान्वित आहे. यातील ६८ योजनांची वीज तोडण्यात आली. गावातील हातपंप आणि विहिरींना पाणी नाही. अशातच नळयोजनेचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. वीज बिलाचा भरणा तत्काळ करण्याची सूचना ग्रामपंचायतींना वारंवार देण्यात आली. यानंतरही ग्रामपंचायतींनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही.
सोनवाढोणा ग्रामपंचायतीकडे ५ लाख ३३ हजार, मालखेड ३ लाख ५५ हजार, बाळेगाव ३ लाख ५८ हजार, लाडखेड ८ लाख १४ हजार, जांभोरा ४ लाख ७२ हजार, चिकणी ४ लाख २९ हजार, वटफळी ९ लाख २२ हजार, पिंप्रीकलगा ६ लाख २५ हजार, मांगलादेवी ७ लाख २१ हजार, ब्राम्हणवाडा ४ लाख ४८ हजार एवढी वीज बिलाची थकीत रक्कम आहे.
ग्रामपंचायतीकडून पाणी कराची वसूली चांगली होत असल्याचे सांगितले जाते. मात्र ही रक्कम इतर कामांवर खर्ची घातली जाते. यावर गटविकास अधिकाºयांचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पाणी कराची वसूली नियमित भरणा करणाºया नागरिकांना आता पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

महावितरण कंपनीच्या आदेशाने ६८ नळयोजनांची वीज तोडण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी रकमेचा भरणा न केल्याने ही कारवाई करावी लागली.
- सतीश कानडे
सहायक अभियंता, नेर
(लाडखेड विभाग)

Web Title: 68 water logged off

टॅग्स :Waterपाणी