५९ गावांत रबी उद्ध्वस्त
By Admin | Updated: February 29, 2016 01:57 IST2016-02-29T01:57:09+5:302016-02-29T01:57:09+5:30
वादळी पावसासह झालेल्या गारपिटीचा जिल्ह्यातील ५९ गावांना जबर फटका बसला.

५९ गावांत रबी उद्ध्वस्त
कोट्यवधींचे नुकसान : पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
यवतमाळ : वादळी पावसासह झालेल्या गारपिटीचा जिल्ह्यातील ५९ गावांना जबर फटका बसला. शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांचे रबी पीक उद्ध्वस्त झाले आहे. सर्वाधिक नुकसान पुसद आणि उमरखेड तालुक्यात झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीचा फटका उमरखेड, पुसद, महागाव, दिग्रस, नेर, बाभूळगाव या तालुक्यांना बसला. पुसद तालुक्यातील २० गावांना गारपिटीने झोडपून काढले. यात साडेतीन हजार हेक्टरवरील रबी पिक उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातील ११ गावांना गारपिटीचा तडाखा बसला असून एक हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. दुसऱ्या दिवशीही शेतामध्ये गारांचे खच दिसत होते. महागाव तालुक्यातील सात गावांना गारपिटीचा फटका बसला असून ३५८ हेक्टरवर नुकसान झाले.
बाभूळगाव तालुक्यातील १३ गावांना फटका बसला. शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, केळी, संत्रा आणि आंबा मोहोरचे नुकसान झाले आहे. (लोकमत चमू)
उमरखेड-पुसदमध्ये सर्वाधिक नुकसान
गारांचा तडाखा : बाभूळगावच्या १३ गावांना फटका
यवतमाळ : शनिवारी झालेल्या गारपिटीचा सर्वाधिक तडाखा पुसद आणि उमरखेड तालुक्याला बसला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून उमरखेड तालुक्यातील काही गावात दुसऱ्या दिवशीही गारांचा खच दिसून आला. तर बाभूळगाव तालुक्यातील १३ गावांना या गारपिटीचा फटका बसला.
पुसद प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यात यावर्षी साडेचार हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली होती. शनिवारी झालेल्या वादळी पावसासह गारपिटीत साडेतीन हजार हेक्टरवरील गहू, हरभरा आणि फळबागांचे नुकसान झाले. यात अंदाजे २० कोटी रुपये नुकसान झाल्याची माहिती आहे. सर्वाधिक फटका वरूड, गौळ आणि पुसद सर्कलला बसला. वरुड आणि पुसदमध्ये प्रत्येकी एक हजार हेक्टर, गौळमध्ये ५०० हेक्टर, खंडाळा सर्कलमध्ये १०० हेक्टर, बेलोरा ५०० हेक्टर, शेंबाळपिंपरी १०० हेक्टर, जांबबाजार आणि ब्राम्हणगाव येथे प्रत्येकी दहा हेक्टर गहू पिकाचे नुकसान झाले. तालुक्यात कुठेही प्राणहानी झाली नाही. मात्र रबीचे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी गारपीट थांबल्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले आणि नायब तहसीलदार देवानंद धबाले यांनी गारपीटग्रस्त मोहा, भाटंबा, इंदिरानगर परिसराची पाहणी केली.
उमरखेड येथील शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील टाळकी, राजापूर, तिवडी, विडूळ, झाडगाव, चालगणी, साखरा, लिंबगव्हाण, नागेशवाडी, वरुड बिबी आदी ११ गावांना गारपिटीचा तडाखा बसला. २४ तासानंतरही अनेक गावात गारांचे थर दिसून येत होते. एक हजार ३२ हेक्टरवरील पिकांचे झाले. आमदार राजेंद्र नजरधने यांनी ११ गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या सोबत महसूल व कृषी विभागाचे अधिकारी होते. टाकळी शिवारात झालेल्या जोरदार गारपिटीत एक म्हैस, शेळी आणि गाय असे तीन जनावरे दगावली.
बाभूळगाव प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी धो-धो पावसासह गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे बाभूळगाव तालुक्यातील आलेगाव, आसेगाव, गळव्ही, पिंपळगाव, बाभूळगाव, कोपरा जानकर, यावली, माहुली, राणी अमरावती, दाभा, पहूर, नागरी, नागरगाव, चेंडकापूर, डेहणी आदी गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आमदार अशोक उईके यांनी नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी तहसीलदार एम.बी. मेश्राम, गटविकास अधिकारी रमेश दोडके, तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर, लक्ष्मण लखमोड, सतीश मानलवार, चुडामण मदारे, किशोर दामोधर, डॉ. सुद्दलवार, अविनाश दहेकर, विनोद लोखंडे, सुमतीलाल लुणावत आदी उपस्थित होते. नुकसानीच्या सर्वेक्षणासंदर्भात सोमवारी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी विभागांच्या कर्मचाऱ्यांची सभा तहसील कार्यालयात आयोजित असून नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. (लोकमत चमू)
सतर्कतेचा इशारा
बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या वाट्यावर असल्याने जिल्ह्याला आठ दिवस सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात पावसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असून काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.