५२ कोटींचा कापूस पाण्यात
By Admin | Updated: January 7, 2015 22:58 IST2015-01-07T22:58:49+5:302015-01-07T22:58:49+5:30
पणन महासंघाने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर खरेदी केलेला कापूस अवकाळी पावसाने ओला झाला. दुर्गंधी सुटलेला कापूस कोरडा करण्यासाठी जागा मिळेल तिकडे पसरविण्यात आला आहे.

५२ कोटींचा कापूस पाण्यात
दुर्गंधी सुटली : अनिश्चित काळासाठी खरेदी बंद, खासगी दर घसरले
यवतमाळ : पणन महासंघाने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर खरेदी केलेला कापूस अवकाळी पावसाने ओला झाला. दुर्गंधी सुटलेला कापूस कोरडा करण्यासाठी जागा मिळेल तिकडे पसरविण्यात आला आहे. दरम्यान, पणन महासंघाने अनिश्चित काळासाठी खरेदी बंद केली आहे. याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत.
यवतमाळ आणि वणी विभागात केंद्रांवर पणन महासंघाने नाफेडच्या मदतीने कापूस खरेदी केली. व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी दर आणि बोनसच्या आशेने शेतकऱ्यांनी आपला कापूस मोठ्या प्रमाणात पणनला दिला. मोठ्या प्रमाणात आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजला. एवढेच नाही तर, वाहते पाणी कापसाच्या गंजी खालून वाहून गेले. सलग आठ दिवस ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे ओला झालेला कापूस वाळविणे शक्य झाले नाही. परिणामी कापसाची गंजी लागली आणि यातून संपूर्ण कापसाला दुर्गंधी सुटली. आता वातावरण स्वच्छ होताच मजुरांच्या मदतीने कापसाची गंजी कोरडी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
यवतमाळ आणि वणी विभागात नऊ केंद्रांवर एक लाख २९ हजार १३९ क्विंटल कापसाची खरेदी झाली. बाजार दरानुसार खरेदी झालेला हा कापूस ५२ कोटी ३० लाख १२ हजार ९५० रुपयांचा आहे. कापूस ओला झाल्याने त्याची प्रत घसरणार आहे. परिणामी महासंघाला मोठे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे.
जिनिंगमध्ये असलेली आरक्षित जागा कापूस वाळण्यासाठी अपुरी पडत आहे. यामुळे पणन महासंघाने सर्वच केद्रांवर अनिश्चित काळासाठी खरेदी बंद केली आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. पूर्वी खासगी व्यापाऱ्यांचा आणि पणनचा दर सारखाच होता. खरेदी बंद होताच कापसाचा दर चार हजारावरून तीन हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आला. क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली आहे. या स्थितीने सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाच हे संकट हवालदिल करणारे आहे. (शहर वार्ताहर)
शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना मॉश्चर मीटर लावण्यात आले. आठ पेक्षा अधिक मॉश्चर (ओलावा) असलेला कापूस पणनने परत पाठविला. चांगली प्रतवारी जपता यावी, यासाठी ही दक्षता घेण्यात आली. मात्र अवकाळी पावसाने पणनच्या या सर्व प्रयत्नावर पाणी फेरले गेले.
... तरी दर पडले
सरकी आणि रूईच्या दरावर कापसाचा दर निश्चित होतो. १५०० रुपये क्विंटलची सरकी १६५० रुपयाच्या घरात पोहोचला आहे. रूईचे दर प्रतिखंडी ३३ हजार ६०० रूपयावरून ३४ हजार २०० रुपयावर पोहोचले आहे. यामध्ये ६०० रुपयांची वाढ झाली आहे. यातून कापसाचे दर वाढण्याची शक्यता असतानाही पणनची खरेदी बंद होताच व्यापाऱ्यांनी दर पाडले.