जिल्ह्यात ३६७ कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:38+5:30
कुपोषण भरून निघावे म्हणून दुध, अंडी आणि केळी दिली जात होती. शेंगदाण्याचे लाडू आणि पोटभर आहारासोबत डब्यातही आहार दिला जात होता. मात्र हा आहार आता बंद झाला आहे. कुपोषणग्रस्त लाभार्थ्यांच्या धान्यात कपात करण्यात आली. सुदृढ बालक आणि कुपोषित बालकामध्ये धान्य वितरणात मोठी तफावत आहे. कुपोषित बालकाला अधिक धान्य गरजेचे आहे.

जिल्ह्यात ३६७ कुपोषित बालके
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा प्रकोप वाढला, तसा कुपोषित बालकांना तंदुरूस्त करण्यासाठी दिला जाणारा सकस आहार कमी करण्यात आला. ग्रामीण भागात तर लाडू, दुध, अंडी थांबविण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील ३६७ कुपोषित बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा धोका आहे.
कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. पूर्वी शिजवून दिला जाणार आहार बंद झाला. त्याऐवजी घरपोच धान्य पुरविण्याचे आदेश आहे. मात्र शहरी भागात हा नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. कार्यक्षेत्र मोठे असल्याच्या कारणाने अंगणवाडीताई लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवितात. तेथे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असताना शहरी भागात अंगणवाडीताई सुरक्षेच्या उपाय योजना राबविताना अपुऱ्या पडत आहेत.
कुपोषण भरून निघावे म्हणून दुध, अंडी आणि केळी दिली जात होती. शेंगदाण्याचे लाडू आणि पोटभर आहारासोबत डब्यातही आहार दिला जात होता. मात्र हा आहार आता बंद झाला आहे. कुपोषणग्रस्त लाभार्थ्यांच्या धान्यात कपात करण्यात आली. सुदृढ बालक आणि कुपोषित बालकामध्ये धान्य वितरणात मोठी तफावत आहे. कुपोषित बालकाला अधिक धान्य गरजेचे आहे. असे असले तरी त्यांना कमी धान्य देण्याचे कारण काय असावे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. यामुळे पालक अंगणवाडीताईला जाब विचारतात. मात्र आहाराचे प्रमाण वरिष्ठ स्तरावरून ठरल्याचे सांगण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नाही.
अशी आहे धान्य वितरणातील तफावत
सुदृढ बालक
गहू ३ किलो १०० ग्रॅम, मटकी १ किलो ३०० ग्रॅम, मुग १ किलो ३०० ग्रॅम, सोयाबीन तेल ५०० ग्रॅम, हळद २०० ग्रॅम, तिखट २०० ग्रॅम, मिठ ४०० ग्रॅम.
कुपोषित बालक
कुपोषित बालकाला २२५० ग्रॅम गहू, चवळी ७५० ग्रॅम, मसूर ७५० ग्रॅम, तेल ५०० ग्रॅम, मीठ ३०० ग्रॅम, हळद १०० ग्रॅम, मिरची १०० ग्रॅम.
३५ रुपयांची मदत
केंद्र शासनाने गरोदर मातांना ग्रामीण भागात थेट निधी देण्याची घोषणा केली आहे. मध्यंतरी त्यांना आहार मिळाला नाही. आता दीड महिन्यानंतर त्यांच्या खात्यात ३५ रुपये दरदिवस प्रमाणे निधी गोळा होणार आहे.