२७२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केले मुंडण
By Admin | Updated: June 12, 2017 02:06 IST2017-06-12T02:06:58+5:302017-06-12T02:06:58+5:30
जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात

२७२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केले मुंडण
दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त : जमिनी परत करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वेळाबाई नदी संगमस्थानी विठ्ठल रूख्माई मंदिर परिसरात मुंडण सत्याग्रह केला. यात २७२ शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध करीत आपले केस नदीपात्रात अर्पण केले.
१९९९ पासून निप्पान डेन्रो या वीज प्रकल्पासाठी पाण्याची गरज असल्याचे भासवून यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा-बेला नदीकिनारी येणाऱ्या ३२ गावातील सुमारे एक हजार ५०० हेक्टर जमिनी शासनाने अल्पदरात संपादित केल्या. तथापि गेल्या १५ वर्षापासून या वीज प्रकल्पाचा थांगपत्ताही लागला नाही. आता अचानक २०१६ मध्ये याच अधिग्रहीत जमिनी जलसंपदा विभागाला परस्पर हस्तांतरीत केल्या. याबाबत प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना देण्यात आली नाही. भूमिअधिग्रहण कायदा २०१३-१४ नुसार पाच वर्षात संपादित जमिनीवर प्रस्तावित प्रकल्प उभा झाला नाही, तर त्या जमिनी शेतमालकास परत करण्याची तरतूद आहे.
पण १५ ते २० वर्षापासून दिंदोडा प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर कोणताही प्रकल्प न झाल्यास संबंधित जमिनीचे अधिग्रहण रद्द करून त्या सन्मानाने संबंधित शेतकऱ्यांना शासनाने परत करावे किंवा भूमिअधिग्रस्त कायदा १८९४ शासनाने रद्द केला ते भुसंपादन रद्द करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.