पडिक जमिनीवर २३ लाख वृक्षांची लागवड
By Admin | Updated: March 30, 2015 02:00 IST2015-03-30T02:00:24+5:302015-03-30T02:00:24+5:30
पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम शासनाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे.

पडिक जमिनीवर २३ लाख वृक्षांची लागवड
यवतमाळ : पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम शासनाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत वनेत्तर खासगी पडीक जमिनीवर एक हजार १६९ हेक्टर मध्ये २२ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येतो. गेल्या पाच वर्षात पडीक जमिनी तसेच रस्त्यांच्या काठांवर वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात आल्याने या योजनेतून वाढलेली लाखो झाडे पर्यावरणाला हातभार लावीत आहे. २००८-०९ यावर्षी ४१० हेक्टर खाजगी पडीक जमिनीवर ६ लाख २६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. २००९-१० मध्ये ३२८ हेक्टरवर ६ लाख ३३ हजार वृक्ष, २०१०-११ मध्ये २२४ हेक्टरवर ५ लाख ४९ हजार वृक्ष, २०११-१२मध्ये १८२ हेक्टरवर ३ लाख २६ हजार वृक्ष तर २०१२-१३ मध्ये ५३ हेक्टरवर १ लाख ३१ हजार वृक्षांची अशी एकूण १ हजार १९७ हेक्टरवर २२ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लागवड केलेली सरासरी ७५ टक्के झाडे जोमाने वाढली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गतच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची योजना राबविली जात असून २००८-०९ पासून या योजनेंतर्गत जिल्ह्यात २३३ किलो मिटर लांबीच्या मार्गावर दुतर्फा झाडे लावण्यात आली आहे. त्यात १ लाख ३८ हजार झाडांचा समावेश आहे. गट लागवड योजनेंतर्गत २३ हेक्टरवर ३८ हजार वृक्ष लावले आहे. बांबु मिशन योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात ६० हेक्टरवर २४ हजार रोपे लावल्या गेली. किसान रोपवाटिके अंतर्गत गेल्या पाच वर्षात ७ लाख ६७ हजार रोपे तयार करण्यात आली आहे. तर लाभार्थ्यांना ६ लाख ५० हजाराचा अग्रीम देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात वनमहोत्सव रोपवाटिकेच्या माध्यमातून २९ हजार, मध्यवर्ती रोपवाटिकेव्दारे ३ लाख २४ हजार तर गेल्या दोन वर्षात महात्मा गांधी रोहयोव्दारे ९ लाख ६१ हजार रोपे तयार केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)