१८ गावे पाणी टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:36 IST2018-10-26T22:35:35+5:302018-10-26T22:36:27+5:30

शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यातील १८ गावांत विविध कामे घेण्यात आली. यातून ही गावे आता पाणीटंचाईमुक्त झाली आहे. तालुक्यात जलयुक्त शिवारअंतर्गत ३२३ कामे पूर्णत्वास गेली आहे.

18 villages have water scarcity | १८ गावे पाणी टंचाईमुक्त

१८ गावे पाणी टंचाईमुक्त

ठळक मुद्देराळेगाव तालुका : जलयुक्त शिवारातून ३२३ कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यातील १८ गावांत विविध कामे घेण्यात आली. यातून ही गावे आता पाणीटंचाईमुक्त झाली आहे.
तालुक्यात जलयुक्त शिवारअंतर्गत ३२३ कामे पूर्णत्वास गेली आहे. ४० कामे प्रगतीपथावर आहे. यावर्षी तालुक्यात केवळ ५८७ मीमी पाऊस झाला. मात्र कमी पाऊस पडला असतानाही पडलेला पाऊस या योजनेअंतर्गत जमिनीत मुरविण्यात आल्याने ही गावे जलसमृद्ध झाली. आता ती पाणीटंचाईपासून मुक्त झाली आहे. निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाकरिता उपयोग होणार आहे. शिवाय भूजल पातळीसुद्धा वाढली आहे.
सुरूवातीला तालुक्यात ४८५ कामे प्रस्तावित होती. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीनंतर त्यातील ४४३ कामांना प्रत्यक्ष हिरवी झेंडी मिळाली. भिमसेनपूर, एकलारा, धुमक-चाचोरा, आंजी, पिंपरी दुर्ग, वेडशी, वाठोडा, गुजरी, झरगड, खडकी, मंगी, कोपरी, श्रीरामपूर, पिंपळापूर, पळसकुंड, खेमकुंड, खैरगाव (जवादे), खडकीसुकळी या गावांत जलयुक्तची कामे घेण्यात आली. त्याअंतर्गत पाच सलग समतल चर, १२ ढाळीचे बांध, ८९ शेततळे, पाच सिमेंट बंधारा दुरूस्ती, नाला बांध, नाला खोलीकरण, १३६ रिचार्ज शाफ्ट, वनतळे, २१ पाणी साठवण तलाव, ३७ विहीर पुनर्भरण आदी कामे करण्यात आली.
या कामांमुळे ५०० ते ६०० हेक्टर कृषी भूमी सिंचित होऊ शकणार आहे. केवळ २५ लाख रुपयांत ही कामे पूर्ण करण्यात आली. याशिवाय ३०० शेततळे, मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आली. उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान मोहिमेचे अध्यक्ष संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी संजय पाठक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कामे पूर्णत्वास नेली.

Web Title: 18 villages have water scarcity