जनआरोग्य योजनेतून १४७ कोटींचा परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:13+5:30
महागाईच्या काळात खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला महागडा उपचार परवडत नाही. त्यामुळे अनेकांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही परिस्थिती लक्षात घेऊनच राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

जनआरोग्य योजनेतून १४७ कोटींचा परतावा
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णाला मोफत उपचार मिळतो. त्यासाठी जिल्ह्यात १५ खासगी रुग्णालय, तर आठ शासकीय रुग्णालय योजनेशी जोडलेले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ पासून या योजनेचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत ३९ हजार ४८३ रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. या मोबदल्यात खासगी रुग्णालयांना १४७ कोटी ६ लाख ४९ हजार ७९२ रुपयांचा परतावा मिळाला आहे.
महागाईच्या काळात खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला महागडा उपचार परवडत नाही. त्यामुळे अनेकांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही परिस्थिती लक्षात घेऊनच राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. नंतर युती सरकारच्या काळात योजनेचे नाव बदलवून महात्मा फुले जनआरोग्य योजना करण्यात आली. शिवाय या योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली. सामान्य नागरिकांना एखादा गंभीर आजार झाला तर पैशांअभावी त्याला जीव गमवावा लागू शकतो. आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे खासगीतही रुग्णांना मोफत उपचार घेता येत आहे. जनआरोग्य योजनेत लाभार्थींना लाभ मिळवून देण्यामध्ये खासगी रुग्णालय आघाडीवर आहेत. जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह १५ खासगी रुग्णालयातही जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. याशिवाय तीन उपजिल्हा रुग्णालय व पाच ग्रामीण रुग्णालयातही योजनेचा लाभ देण्यात येतो. शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया व इतर दुर्धर आजारांचा उपचार घेणाºया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच खासगी रुग्णालयांना जनआरोग्य योजनेतून उपचार खर्चाच्या मोबदल्यात कोट्यवधींचा परतावा मिळाला आहे. या योजनेत १५ हजार २७९ शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात आला. ४०० च्यावर आजारांवर उपचार केला जातो. यात विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.