१२३ कोटींचे चुकारे अडले

By Admin | Updated: June 13, 2017 01:19 IST2017-06-13T01:19:09+5:302017-06-13T01:19:09+5:30

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आश्वासन पूर्ण होण्यापूर्वीच तूर खरेदीची मुदत संपली.

123 crores have been stuck in cash | १२३ कोटींचे चुकारे अडले

१२३ कोटींचे चुकारे अडले

तूर खरेदी थांबली : ८३ हजार क्विंटल तूर गोदामाच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आश्वासन पूर्ण होण्यापूर्वीच तूर खरेदीची मुदत संपली. आतापर्यंत खरेदी झालेल्या तुरीतील १२५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यामुळे मान्सून तोंडावर असताना पेरण्या करायच्या कशा, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
तूर खरेदीसाठी राज्य शासनाने विविध पाच योजनांची अंमलबजावणी केली. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर तीन लाख ९८ हजार ५१७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी झालेल्या तुरीची किंमत १९७ कोटींच्या घरात आहे.
खरेदी झालेल्या तुरीपैकी ७२ कोटी ७६ लाख ६९ हजार १८५ रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले. तर १२३ कोटी ९३ लाख ९४ हजार रूपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना भेटायचे आहेत. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
शासकीय हमी केंद्रात तूर विकल्यांनतर दीड महिन्याचा अवधी लोटला. मात्र, शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे भेटले नाही. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर पेरणी करायची कशी, प्रश्न आहे.

आधी गोदाम, नंतरच निधी
शासकीय तूर खरेदी केंद्रावर प्रचंड आवक आहे. खरेदी झालेली तूर ठेवण्याकरिता गोदामच उपलब्ध नाही. यामुळे खरेदी झालेली ८३ हजार क्विंटल तूर अद्यापही शेडमध्येच पडून आहे. ही तूर गोदामात पोहोचल्यानंतरच चुकाऱ्यांचा निधी वळता होणार आहे. यामुळे तूर तत्काळ गोदामात पोहोचविण्याचे मोठे आव्हान शासकीय केंद्रापुढे निर्माण झाले आहे.

Web Title: 123 crores have been stuck in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.