वाघाच्या बंदोबस्तासाठी १२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:27 IST2018-08-31T22:24:10+5:302018-08-31T22:27:26+5:30

राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील तब्बल १५ जणांचे बळी घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलली आहे.

12 crores for the warehouses | वाघाच्या बंदोबस्तासाठी १२ कोटी

वाघाच्या बंदोबस्तासाठी १२ कोटी

ठळक मुद्देअपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांची भेट : मध्यप्रदेशातून येणार चार हत्ती

अशोक पिंपरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील तब्बल १५ जणांचे बळी घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलली आहे. त्यासाठी जंगलालगत विशिष्ट ठिकाणी कुंपन करण्यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वाघाला बेशुद्ध करण्याकरिता मध्यप्रदेशातून चार हत्ती व इतर कर्मचारी पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाघ प्रभावीत क्षेत्रात हत्तीवरून शोध घेऊन वाघाला चारही बाजूने घेरून बेशुद्ध केले जाणार आहे. वाघाच्या भितीने राळेगाव, कळंब, पांढरकवडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले. मजुरांची मजुरी बंद झाली. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे वन विभागातर्फे प्रभावित क्षेत्रात उंच मचान उभारण्यात येणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेती करता यावी, यासाठी कुणी तरी मचानवर उभे राहून चारही बाजूने लक्ष ठेवणार आहे.
सराटी, बोराटी, लोणी, बंदर, मोहदा, वेडशी, सावरखेडा, वरध, डोंगरखर्डा, किनवट, तेजनी, विहीरगाव या क्षेत्राला वाघ प्राभवीत क्षेत्र मानले गेले असून येथे वाघाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे जंगलात विशिष्ट भागात कुंपन उभारून गावकऱ्यांना संरक्षण देण्याकरिता १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही लिमये यांनी स्पष्ट केले. कुंपनाचे काम येत्या काही दिवसांत सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेऊन सूचना देल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य वनसंरक्षक पी.जे. राहुलकर, उपवन संरक्षक के. अर्भणा, सहाय्यक व्यवस्थापक वसंत सरपे उपस्थित होते. त्यांच्याकडे उपस्थितांनी वाघ पकडण्याची मागणी केली. जनतेतर्फे माजी मंत्री प्रा.वसंत पुरके, अशोक केवटे, अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे, अंकुश मुनेश्वर, नीलेश रोठे, जयप्रकाश रागीनवार आदींनी बाजू मांडली
अभयारण्याचा प्रस्ताव नाही
या परिसरात वाघाला पोषक वातावरण असल्यामुळे येथे भविष्यात अभायारण्य होईल म्हणून वनविभाग वाघाला पकडत नसून येथे अभयारण्य होणार असल्याची चर्चा होती. मात्र अभयारण्याचा प्रस्तावच नसून भविष्यातही अभयारण्या होणार नाही, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
संपर्क कार्यालय राळेगावात
जंगलाचा बराच भाग राळेगाव तालुक्यात येतो. मात्र वन कार्यालय मारेगाव येथे असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संपर्क होण्यास वेळ लागतो. यामुळे आता वनविभागाचे उपकार्यालय राळेगावात सुरू करण्याचे निश्चित झाले. येथे दोन अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. कार्यालयासाठी वास्तू उपलब्ध करून देण्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सोळावा बळी न जाण्याची काळजी घ्या
आत्तापर्यंत वाघाने १५ बळी घेतले आहे. आता १६ वा बळी जाणार नाही एवढी शासन व वनविभागाच्या कर्मचाºयांनी काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे सावरखेडा येथील लेतूजी जुनघरे व जयप्रकाश रागीनवार यांनी लिमये यांच्याकडे केली.

Web Title: 12 crores for the warehouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ