साठवण तलावाचे काम रखडलेलेच!
By Admin | Updated: May 19, 2014 01:14 IST2014-05-19T01:03:58+5:302014-05-19T01:14:23+5:30
वाशिम जिल्ह्यातील लोहगाव येथील साठवण तलावाचे काम मागील चार वर्षापासून रखडलेले.

साठवण तलावाचे काम रखडलेलेच!
लोहगाव :येथील साठवण तलावाचे काम मागील चार वर्षापासून अजुनही पुर्णत्वाकडे गेले नाही. यामुळे परिसरतील शेतकर्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. ११ जून २0१0 रोजी आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते येथील साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आले होते. निधी प्राप्त होताच कासवगतीने साठवण तलावाच्या कामाला सुरूवात तर झाली परंतु आजरोजी चार वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला असतानाही या तलावाचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले नाही, ही आश्चर्याची बाब आहे. दरम्यान, साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील शेतकर्यांच्या घरी समृद्धी नांदू शकते. साठवण तलावातील पाण्याने शेतीचे सिंचन केल्या जावू शकते. ज्यामुळे शेतकरी आपले जीवनमान उंचावून कर्जातून मुक्त होवू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागते. साठवण तलावातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावकर्यांची ही गैरसोयही कायमची दूर होण्यास मदत होवू शकते. तसेच गुराढोरांना पाणी मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सिंचनाची सोय नसल्याने येथील बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. कोरडवाहू शेतीत उत्पन्न कमी होते. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी आर्थिक डबघाईत आले आहे. साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यास शेतकरी या पाण्याच्या भरोशावर शेती करू शकतो. म्हणून संबंधित विभाग तथा लोकप्रतिनिधींनी अर्धवट राहिलेल्या साठवण तलावाच्या कामाला सुरूवात करावी अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.