विद्युत उपकेंद्रांची कामे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:50+5:302021-09-07T04:50:50+5:30
........... महामार्ग पोलीस केंद्राकडून वाहनचालकांचे प्रबोधन वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून सोमवार, ६ सप्टेंबर ...

विद्युत उपकेंद्रांची कामे प्रलंबित
...........
महामार्ग पोलीस केंद्राकडून वाहनचालकांचे प्रबोधन
वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून सोमवार, ६ सप्टेंबर रोजी महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या चालकांचे प्रबोधन करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसह वाहन चालकांनी प्रवासादरम्यान मद्य प्राशन करू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदडे यांनी केले.
.............
समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत शिबिर
वाशिम : समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील गावांमध्ये मार्गदर्शन शिबिर घेणे सुरू आहे. या माध्यमातून गावकरी व शेतकऱ्यांना जलव्यवस्थापन, मृदा संवर्धन, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची शास्त्रशुद्ध पद्धत यांसह इतरही महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
..............
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : शहरातील काही उत्साही युवकांनी नव्या वर्षांत १ जानेवारी २०२१पासून वर्षभर ‘३६५ दिवस शिवजलाभिषेक सोहळा’ हा उपक्रम हाती घेतला. याअंतर्गत येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास सोमवारी सकाळी जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शहरातील युवकांची उपस्थिती होती.
............
मेडशी वळण रस्त्यावर फलकाचा अभाव
वाशिम : वाशिम ते अकोला मार्गावर असलेल्या मेडशी गावानजीक वळण रस्ता आहे. याठिकाणी समोरून येणारे वाहन सहजासहजी दृष्टीस पडत नाही. यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एखादवेळी मोठा अपघातही घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, वळण रस्त्यावर दोन्ही बाजूंनी फलक लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
..............
जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना आजही पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यासह रुग्ण भरती ठेवल्या जाणाऱ्या वार्डांसमोर घाण पसरलेली असते. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली जात नाही. एकूणच या सर्व बाबींकडे लक्ष पुरवून स्वच्छता राखण्यात यावी, अशी मागणी आकाश मुळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केलेल्या निवेदनात केली.