जिल्हा परिषदेचे १४ गट, पंचायत समितीच्या २७ गणांचा वाली कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST2021-08-24T04:45:08+5:302021-08-24T04:45:08+5:30
वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ४ मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या १४ गटांचे सदस्य आणि पंचायत समितीच्या २७ सदस्यांची ...

जिल्हा परिषदेचे १४ गट, पंचायत समितीच्या २७ गणांचा वाली कोण?
वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ४ मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या १४ गटांचे सदस्य आणि पंचायत समितीच्या २७ सदस्यांची पदे रिक्त झाली. साडेपाच महिन्यांपासून १४ गट आणि २७ गणांना कुणी वाली नसल्याने विकास खुंटण्याची भीती वर्तविली जात आहे. या गट आणि गणांतील गावांच्या विकासासंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृहात आवाज उठविण्यासाठी प्रतिनिधी नसल्याने निधी कसा मिळेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२०मध्ये झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास गवळी यांच्यासह अन्य काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. न्यायालयाच्या या निकालानुसार, ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषदेचे १४ व पंचायत समितीच्या २७ सदस्यांची पदे रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक कार्यक्रमही घोषित झाला. परंतु, कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तसेच निर्बंध शिथिल झाले असल्याने, निवडणूक कार्यक्रमावरील स्थगिती हटविण्यात येईल किंवा नाही, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. दरम्यान, गत साडेपाच महिन्यांपासून १४ गट आणि २७ गणांना लोकप्रतिनिधी नसल्याने या गट व गणांतील जवळपास २०० गावांचा विकास खुंटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. या गावातील समस्या, विकासात्मक कामांबाबत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सभागृहात आवाज उठविण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने आगामी काळात निधी खेचून आणणार कोण? असा प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
०००००००००००००
बॉक्स
निधी नियोजनात या गटांचा विचार होईल का?
जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन पदाधिकारी व सदस्य मिळून करीत असतात. निधी वाटपात सत्ताधारी गटातील सदस्यांना झुकते माप दिले जाते, हा आजवरचा अनुभव आहे. १४ सदस्यांची पदे रिक्त असल्याने निधी वाटप नियोजनात १४ गटांचा विचार होणार का?, पूर्वीसारखा निधी या गटांना मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
००००००००००००००
बॉक्स
असे आहेत जि. प. गट व पं. स. गण !
१) जि. प. गट : काटा, पार्डी टकमोर, उकळी पेन, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, आसेगाव, भामदेवी, कुपटा, तळप बु., फुलउमरी.
२) पं. स. गण : मोहगव्हाण, उंबर्डाबाजार, पोहा, धामणी खडी, कोंडोली, गिरोली, धामणी, शेंदुरजना, पेडगाव, वनोजा, कासोळा, सनगाव, मारसूळ, जऊळका, जोडगव्हाण, शिरपूर २, खंडाळा शिंदे, कवठा खु., हराळ, वाकद, महागाव, मोप, फाळेगाव थेट, कळंबा महाली, उकळीपेन, अनसिंग, पिंपळगाव.