राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांच्या आकांक्षांचा वाजला नगाडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:01+5:302021-09-25T04:45:01+5:30

वाशिम : राज्य शासनाने नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने वाशिम शहरातील प्रभाग रचनाही पुन्हा बदलणार आहे. सध्या ...

Three in the state, three in the ward; The aspirations of the aspiring candidates have been shattered! | राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांच्या आकांक्षांचा वाजला नगाडा !

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांच्या आकांक्षांचा वाजला नगाडा !

वाशिम : राज्य शासनाने नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने वाशिम शहरातील प्रभाग रचनाही पुन्हा बदलणार आहे. सध्या दोन सदस्यीय प्रभाग असून, नव्या रचनेत ही संख्या वाढणार आहे. यामुळे इच्छुकांनी आतापर्यंत चालविलेल्या तयारीवर पाणी फेरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्थानिक नगरपालिकेत सध्या १३ प्रभाग आहेत. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते; तर एका प्रभागातून तीन उमेदवार निवडण्यात आले. नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होऊन नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अशोक हेडा निवडून आले होते. पक्षीय बलाबल पाहता पालिकेत भाजपचे १५, शिवसेनेचे ८, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत.

.....................

पालिकेतील सध्याची स्थिती

वाशिम नगरपालिकेत सध्या शिवसेनेचे अशोक हेडा नगराध्यक्षपदी विराजमान आहेत. नगरसेवकांची संख्या २७ असून, दोन सदस्यीय प्रभागरचना असून, एका प्रभागातून तीन सदस्यांना गतवेळच्या निवडणुकीतून निवडून देण्यात आले होते.

.............

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

राज्य शासनाच्या नव्या नियमामुळे वाशिम शहरातील प्रभागांच्या संख्येत वाढ होईल. त्यानुषंगाने दोन ते तीन नगरसेवकही वाढतील. आरक्षित आणि खुल्या वर्गाच्या जागांनुसार नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. एकूणच या सर्व बाबींमुळे इच्छुकांना नव्याने तयारी करावी लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

............

दोघांना द्यावे लागणार मत

एका मतदाराला प्रभागात दोन मते द्यावी लागणार आहेत. अर्थात दोघाजणांना निवडून द्यायचे असल्याने दोन उमेदवारांना मते द्यावी लागतील. गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे प्रभागातील दोन किंवा तीन उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार अशा तीन किंवा चार ठिकाणी मतदान करावे लागले होते. यामुळे मतदान यंत्रावर यावेळी उमेदवारांची गर्दी कमी राहणार आहे.

.............

शहर विकासाचे काय?

थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची बांधिलकी ही संपूर्ण शहरासोबत असते. त्यामुळे सर्वच भागात त्यांना सारखा विकास व कामे करावी लागतात. प्रभाग पद्धतीत मात्र कुठल्याही एका प्रभागातून निवडून आलेला नगरसेवक नगराध्यक्ष होतो. त्यामुळे विरोधकांच्या प्रभागात कामांबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. हा प्रकार पुढेही घडल्यास शहर विकासाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

...............

कोट :

गतवेळी झालेली प्रभागरचना योग्य होती. आगामी निवडणुकीत मात्र त्यात पुन्हा बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याला विशेष असा काहीच अर्थ नाही. भाजपचे उमेदवार नव्या प्रभाग पद्धतीनुसार निवडणुकीला सामोरे जातील.

- राहुल तुपसांडे, शहराध्यक्ष, भाजप

............

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. याशिवाय विकासकामांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गतवेळप्रमाणेच यंदाही एका प्रभागातून दोन उमेदवार हीच पद्धत कायम असायला हवी. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला काॅंंग्रेसचा विरोध आहे.

- शंकर वानखेडे, शहराध्यक्ष, काॅंंग्रेस

..................

राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीमुळे अधिकाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरू शकतील. यामुळे स्पर्धा वाढून निवडून आल्यानंतर प्रभागांचा विकासही झपाट्याने होणे शक्य आहे. नव्या नियमानुसार पक्षाचे उमेदवार तयारीला लागतील.

- शे. ताजू शे. मजीद, शहराध्यक्ष, राष्ट्रीय काॅंंग्रेस

.............

वाशिम शहरात दोनसदस्यीय प्रभाग रचना आहे. या पद्धतीनुसार गतवेळची निवडणूक झाली होती. आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत अमलात येणार असल्याने निश्चितपणे काही अडचणी जाणवतील; मात्र राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे, असे माझे मत आहे.

- गजानन भांदुर्गे, शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: Three in the state, three in the ward; The aspirations of the aspiring candidates have been shattered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.