वाटमारी करणारे तीन चोरटे जेरबंद
By Admin | Updated: June 1, 2015 02:15 IST2015-06-01T02:15:49+5:302015-06-01T02:15:49+5:30
हिंगोली पोलीसांची वाशिम येथे कारवाई.
_ns.jpg)
वाटमारी करणारे तीन चोरटे जेरबंद
कनेरगाव नाका (जि. वाशिम): : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील फाळेगाव ते कनेरगाव नाका दरम्यान राज्य रस्त्यावर वाटमारी करून दुचाकीस्वारांना लुटणार्या टोळीतील तिघांना हिंगोली पोलिसांनी ३0 मे रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास वाशिम येथे पकडले. फाळेगाव येथील बबन हरणे व त्यांचा मुलगा रूपेश हरणे हे दोघे हिंगोली येथे शुक्रवार, २९ मे रोजी हळद विकण्यास गेले होते. हळद विकून अडत्याकडून ८२ हजार रुपये घेऊन दुचाकीने ते दोघे गावाकडे जाण्यास निघाले. फाळेगाव फाट्यावरून दुचाकी वळताच पाठीमागून दुचाकीवर तिघांनी येत या दोघांजवळील रक्कम बळजबरीने काढून घेतली व कनेरगाव नाकामार्गे चोरटे दुचाकीवरून विदर्भाच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, रूपेशने याबाबत मोबाइलवरून माहिती दिल्याने परिसरातील ६0 ते ७0 ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत दुचाकीचा पाठलाग केला. चोरटे घटनास्थळापासून दोन किमी अंतरावर दुचाकी एका शेतात टाकून पळून गेले. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलीस निरीक्षक बी. के. सानप, फौजदार विवेक सोनवणे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे फिरविली. प्रकाश हरणे हे घटनास्थळी पडलेले रिकामे पोते गोळा करीत असताना चोरट्यांचा बंद पडलेला मोबाइल सापडला. सदर मोबाइल पोलिसांच्या हवाली करण्यात आला. घटनास्थळी फाळेगाव येथील रामभाऊ वैद्य, डॉ. हनुमान सारडा, सरपंच गुंजकर व इतर ग्रामस्थ जमले होते. तपासासाठी एक पथक वाशिम येथे पोहोचले. शनिवारी पहाटे सदर पथक वाशिम तालुक्यातील सुरकुंडी गावात जाऊन धडकले. त्या गावातून पोलिसांनी आरोपी खैरू छोटू रेगीवाले, मदन सुभाष मधुरवाड (२२, रा.उकळी पेन जि. वाशिम), शेख जाफर शेख बबलू (नालसाबपुरा जि. वाशिम) यांना अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकीसह लोखंडी पाइप, मोबाइल जप्त केला. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी या पथकाला सहकार्य केले.