चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:41+5:302021-09-05T04:47:41+5:30
बायपास परिसरातील साई संकुलमधील मातोश्री कृषिसेवा केंद्र व काटोले एरिगेशन सर्व्हिसेस या दोन दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश ...

चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडली
बायपास परिसरातील साई संकुलमधील मातोश्री कृषिसेवा केंद्र व काटोले एरिगेशन सर्व्हिसेस या दोन दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश मिळविला. परंतु यात नगदी रक्कम सापडली नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिवाजी नगराकडे वळविला. तेथील मोहिनी ट्रेडर्स या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश मिळविला. गल्ल्यातील जवळपास दीडशे रुपयांवर डल्ला मारला. त्यानंतर चोरटे भारतीय स्टेट बॅंक परिसरात गेले आणि तेथील शांती हार्डवेअर व हरिओम इलेक्ट्रिकल्स या दोन दुकानांचे शटर वाकवून जवळपास अडीच हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी फोडलेल्या एकाही दुकानातील साहित्य मात्र चोरीला गेले नाही. दरम्यान, दुकान मालकांनी कारंजा शहर पोलिसांत यासंदर्भात तक्रारी दाखल केल्याची माहिती दिली आहे. कारंजा शहरातील विविध वसाहतीत मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु त्यातील चोरटे मात्र जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले नाही. आता तर अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडून एकप्रकारे नवीन ठाणेदार आधारसिंग सोनोने यांना जणू सलामीच दिली आहे.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
शांती हार्डवेअरमधील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून, ४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी चोरट्यांनी दुकानात प्रवेश मिळविल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी आपले चेहरे झाकले असल्याने चेहरा ओळख झाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेजण दिसत असून, त्यांची दुचाकीसुध्दा दिसत आहे. परंतु दुर्दैवाने दुचाकीवरील क्रमांक दिसत नसल्याने चोरट्यांची ओळख पटली नाही.