उन्हाचा पारा चढला
By Admin | Updated: May 18, 2015 01:36 IST2015-05-18T01:36:59+5:302015-05-18T01:36:59+5:30
शनिवारपासून तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त.

उन्हाचा पारा चढला
वाशिम : ढगाळ वातावरणाने कमी झालेला तापमानाचा पारा शनिवारपासून पुन्हा वर सरकत आहे. तापत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यापासून उन्हाचा पारा वर सरकत आहे. मध्यंतरी ४२ अंश सेल्सिअसपेक्षा पार्याने उच्चांक गाठला होता. ११ मेपासून जिल्हय़ावर ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांची काही अंशी सुटका झाली होती; मात्र शनिवारपासून (दि.१६) पारा पुन्हा वर सरकल्याने, अंगाची काहिली करणार्या उष्णतेची दाहकता कमालीची वाढत आहे. दरम्यान, उष्माघाताशी दोन हात करण्यास जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज आहे. सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. दिवसागणिक तापमानात विक्रमी वाढ होत असल्याची नोंद होत आहे. परिणामी जिल्हावासीयांच्या अंगाची काहिली होत आहे. आग ओकणार्या सूर्यामुळे जिल्हावासी होरपळत आहे. ताप येणो, त्वचा कोरडी पडणे, चक्कर येणे, भूकन लागणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, अस्वस्थता वाटणे, बेशुद्धावस्था येणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून येताच, रुग्ण सावधगिरीचा उपाय म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांची गर्दी झाली होती. उष्माघाताने अद्याप एकही बळी घेतला नसला तरी धारण केलेला रुद्रावतार चिंतनीय असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. शनिवारपासून तापमान ४0 च्या वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो.