काहींनी सोडले मैदान, काहींची दावेदारी कायम
By Admin | Updated: October 2, 2014 01:23 IST2014-10-02T01:23:18+5:302014-10-02T01:23:18+5:30
वाशिम जिल्ह्यातील विधानसभेच्या कुरूक्षेत्रातून ४८ उमेदवारांची माघार.

काहींनी सोडले मैदान, काहींची दावेदारी कायम
वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात १0५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी १ ऑक्टोबरला तब्बल ४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यामध्ये वाशिम मतदारसंघातील ९, कारंजा मतदारसंघातील २३ तर रिसोड मतदारसंघातील १६ उमेदवारांचा समावेश आहे.त्यामुळे आता तीनही मतदारसंघात ५७ उमेदवार रिंगणात कायम आहेत.
वाशिम विधानसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये काही पक्षांच्या बंडखोरांचाही समावेश होता. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यातील ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आज अखेर २0 उमेदवार रिंगणात कायम आहेत. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांचाही समावेश आहे. कारंजा मतदारसंघात सर्वाधिक ४४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी २३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे आता २१ उमेदवार रिंगणात कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या आमदार प्रकाश डहाके यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम असल्यामुळे येथील लढत पंचरंगी होणार असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार्या जिल्हा परिषद सभापती हेमेंद्र ठाकरे यांनीही ऐनवेळी माघार घेतली आहे. रिसोड म तदारसंघात उमेदवारी दाखल केलेल्या ३२ उमेदवारांपैकी निम्म्या म्हणजेच १६ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे १६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. शिवसंग्रामच्या वतीने उमेदवारी दाखल केलेल्या दिलीप जाधव व विष्णुपंत भुतेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे पंचरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.