सहा लाख नागरिकांना कोरोनाचा धोका लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:13+5:302021-09-04T04:49:13+5:30
वाशिम : जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १० लाखांपेक्षा अधिक नागरिक कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत. असे असले तरी आतापर्यंत केवळ ...

सहा लाख नागरिकांना कोरोनाचा धोका लागू
वाशिम : जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १० लाखांपेक्षा अधिक नागरिक कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत. असे असले तरी आतापर्यंत केवळ ४ लाख नागरिकांनीच कोरोनाची लस घेतली असून ६ लाखांवर नागरिक लस घेण्यास अद्याप पुढे आलेले नाहीत. अशात संसर्गाची तिसरी लाट आल्यास लसीपासून दूर असलेल्या नागरिकांना सर्वाधिक धोका उद्भवू शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
एप्रिल २०२० या महिन्यात जिल्ह्यातील मेडशी (ता. मालेगाव) येथे कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून उद्भवलेले हे संकट आजही पूर्णत: निवळलेले नाही. संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० बाधित रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक प्रमाण ३१ ते ४५ या वयोगटातील होते. या लाटेत कोरोनाने १५८ जणांना जीव गमवावा लागला. त्या तुलनेत फेब्रुवारी २०२१ नंतर आलेली दुसरी लाट मात्र अतितीव्र स्वरूपाची ठरली. गेल्या सहा महिन्यांत कोरोनाने तब्बल ३४ हजार २८३ जणांना विळख्यात घेतले; तर ४८० जणांचा संसर्गाने बाधित होऊन मृत्यू झाला.
तथापि, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाटही नियंत्रणात असून दैनंदिन बाधित आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा प्रचंड खालावला आहे. ही बाब आशादायक असली तरी संसर्गाची तिसरी लाट आल्यास पुन्हा एकवेळ जिल्हा हादरू शकतो. त्यासाठी लसीकरणावर विशेष भर देणे गरजेचे ठरत आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने तातडीची पावले उचलून जिल्हाभरात ६६ लसीकरण केंद्र सुरू करून प्रत्येकास लस देण्याचे नियोजन केले; मात्र आजही एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ६० टक्के नागरिक लसीकरणापासून दूरच असल्याचे दिसून येत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे सुमारे ७७ हजार नागरिकांनी मुदत उलटूनही लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य विभागही हतबल झाल्याची एकंदरित स्थिती निर्माण झाली आहे.
.....................
मालेगाव तालुका लसीकरणात ‘ढांग’
जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील १० लाख १३ हजार १८० व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी गेल्या सात महिन्यांत ४ लाख ४ हजार ८८१ व्यक्तींनी पहिला; तर १ लाख ६१ हजार ४९६ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिल्या डोसची टक्केवारी ३९.९६ असून दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ १५.९४ टक्के आहे. त्यातही मालेगाव तालुका सर्वाधिक पिछाडीवर असून, केवळ २७ टक्के व्यक्तींनी लसीचा पहिला आणि ९.८६ टक्के व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला आहे. हे प्रमाण लवकरच न वाढल्यास आणि अशात तिसरी लाट आल्यास सर्वाधिक धोका याच तालुक्याला होऊ शकतो, असा सूर उमटत आहे.
..........................
७४ हजार डोस शिल्लक
आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने दोन्ही प्रकारच्या लसचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, सध्या कोविशिल्डचे ४५ हजार ९६० आणि कोव्हॅक्सिनचे २८ हजार ६० असे एकूण ७४ हजार २० डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
...................
लसीकरणाची तालुकानिहाय टक्केवारी
वाशिम - ४०.५५/२०.२६
कारंजा - ४४.८४/२०.९९
मंगरूळपीर - ४३.१३/१७.९८
रिसोड - ५१.७७/१४.६२
मालेगाव - २७.३८/९.८६
मानोरा - ३०.३८/९.८६
पहिला डोस / दुसरा डोस
..................
१३,७४,७३५
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या
१०,१३,१८०
लसीकरणासाठी पात्र नागरिक
४,०४,८८१
व्यक्तींनी घेतला पहिला डोस
१,६१,४९६
व्यक्तींनी घेतला दुसरा डोस
६,०८,२९९
व्यक्तींनी घेतला नाही एकही डोस
................
कोट :
कोरोनापासून बचाव होण्यासाठी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. पुरेशा प्रमाणात लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासह दोन्ही प्रकारच्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवला जात आहे; मात्र अनेकांकडून लस घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही बाब निश्चितपणे गंभीर असून नागरिकांनी पुढे येऊन लस घेणे अपेक्षित आहे.
- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम