सिग्नल व्यवस्था लालफितशाहीत!
By Admin | Updated: September 1, 2016 02:00 IST2016-09-01T02:00:10+5:302016-09-01T02:00:10+5:30
वाशिम शहरातील प्रमुख चौकांत वाहतूक विस्कळीत: सिग्नन व्यवस्थेच्या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा.

सिग्नल व्यवस्था लालफितशाहीत!
संतोष वानखडे
वाशिम, दि. ३१: वाशिम शहरातील प्रमुख चौकांमधील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार्या ह्यसिग्नलह्ण व्यवस्थेला अजूनही ह्यग्रीनह्ण सिग्नल मिळाला नाही. वाशिम नगर परिषदेने मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव वरिष्ठांनी बासनात गुंडाळून ठेवल्याने प्रमुख चौकांमधील वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहेत. जिल्ह्यातील एकाही शहरातील प्रमुख चौकात सिग्नल व्यवस्था मंजूर नाही.
१ जुलै १९९८ रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून वाशिम हे महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले. १८ वर्षांंंच्या दीर्घ कालावधीनंतरही वाशिम जिल्हा विकासाचे बाळसे धरू शकला नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्याचे ठिकाणी असलेल्या वाशिम शहराच्या प्रमुख चौकांमधील बेशिस्त वाहतुकीला ताळ्यावर आणण्यासाठी वाहतूक नियंत्रक सिग्नल व्यवस्था बसविण्याची मागणी शहरवासीयांमधून समोर आली होती. या पृष्ठभूमीवर २0१0-११ या सत्रात तत्कालीन पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांच्या कार्यकाळात सिग्नल व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चेच्या फैर्या झडल्या होत्या. मात्र, सिग्नलवरील खर्चाचा मुद्दा या चर्चेवर पाणी फेरून गेला. त्यानंतर २0१२-१३ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांनीदेखील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, बैठका घेतल्या. मात्र, पुन्हा निधी व कायमस्वरूपी आर्थिक देखभालीचा मुद्दा आडवा आला आणि हा प्रश्न जागेवरच राहिला. वाशिम नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी सिग्नलसाठी लागणार्या खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव अमरावतीच्या संबंधित विभागाकडे पाठविला. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नसल्याची माहिती आहे. पाटणी चौकात सिग्नलची गरज आहे. या चौकातून दररोज शेकडो वाहनांची रेलचेल असते. तीन-चार वाहतूक शिपाई येथे तैनात असतात. तरीही अनेकवेळा वाहतूक जाम होते. सिग्नल व्यवस्था अंमलात आली, तर बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे. वाशिमप्रमाणेच कारंजा, मंगरुळपीर, रिसोड या शहरातील प्रमुख चौकात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित नाही. परिणामी, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे.