बियाणे उगवलेच नाही; तक्रारींबाबत शेतकरी मात्र उदासीन
By Admin | Updated: December 3, 2014 01:41 IST2014-12-03T01:38:00+5:302014-12-03T01:41:04+5:30
वाशिम जिल्हय़ात केवळ १0 शेतक-यांच्या तक्रारी.

बियाणे उगवलेच नाही; तक्रारींबाबत शेतकरी मात्र उदासीन
नंदकिशोर नारे /वाशिम
खरीप पिकाने दगा दिल्यानंतर केलेला खर्चही हाती न आल्याने शेतकरी हवालदिल झाला. पेरलेले बियाणे उगवले नाही, यासाठी ज्या कंपनीचे बियाणे उगवले नाही त्यांच्याविरोधात तक्रार करण्याकडे शेतकर्यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागातील प्राप्त तक्रारीच्या आकडेवारीवरून दिसून येते.
पेरलेले बियाणे न उगवल्यामुळे जिल्हय़ातील मानोरा तालुक्यातील एका, रिसोड तालुक्यातील ४ तर वाशिम तालुक्यातील ५ अशा जिल्हय़ातील १0 शेतकर्यांनी बियाणे कंपन्याविरूद्ध नुकसान भरपाईची मागणी केली होती. यामधील मानोरा तालुक्यातील एका शेतकर्याने तीन कंपन्यांविरूद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये कंपनीने तक्रारकर्त्या शेतकर्याला नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते; मात्र ते देत असलेली नुकसान भरपाई सदर शेतकर्याला पटली नसल्याने ते अमान्य केली होती; तसेच वाशिम तालुक्यातील ५ शेतकर्यांनी केलेल्या तक्रारींपेैकी एका शेतकर्याला बियाणे कंपनीने नुकसान भरपाई दिल्यामुळे त्यांनी तक्रार मागे घेतली होती.
यावर्षी अनेक कंपनीचे बियाणे उगविले नाही म्हणून व पावसाने दगा दिल्याने शेतकर्यांना अनेक ठिकाणी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पावसामुळे पिके न आल्याने शेतकर्यांना मदत मिळणे अपेक्षित होते; मात्र यापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. बियाणे उगविले नाही ही नैसर्गिक आपत्ती होऊ शकत नाही म्हणून याबाबत कोणत्याच प्रकारची मदतीची उपाय योजना कृषी विभागाकडून राबविण्यात आली नाही. त्यांनी शेतकर्यांच्या तक्रारी घेऊन संबंधित बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात ३ हजार ६५0 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत १ हजार ५११ शेतकर्यांनी तक्रारी केल्यात, त्यामध्ये वाशिम जिल्हय़ातील केवळ १0 तक्रारींचा समावेश आहे.