हजेरीपत्रकाअभावी रोहयोची कामे ठप्प
By Admin | Updated: April 20, 2015 01:56 IST2015-04-20T01:56:31+5:302015-04-20T01:56:31+5:30
रिसोड तालुक्यातील प्रकार ; १ मेपर्यंंत हजेरीपत्रक मिळणार नाही.

हजेरीपत्रकाअभावी रोहयोची कामे ठप्प
रिसोड : रिसोड पं.स. मधील रोहयोमधील असंख्य कामे हजेरीपत्रक व मोजमाप पुस्तिकेअभावी ठप्प पडली आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सिंचन विहिरी, शेततळे, पांदन रस्ते, नाला सरळीकरण इत्यादी भूविकास व जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. मात्र दि. २५ मार्च २0१५ पासून मागणी अर्जानुसार हजेरी पत्रके काढणे बंद आहे. ५ एप्रिलपर्यंंंत वार्षिक हिशोबामुळे हजेरी पत्रक काढणे बंद असल्याचे सांगण्यात येत होते; मात्र १५ एप्रिल पर्यंंंत इंटरनेट चालू नसल्याचे सांगण्यात येत होते. तर आता १ मे पर्यंंंत हजेरीपत्रक मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे असंख्य कामे प्रभावित होऊन मजुरांना उपासमारीची वेळ पंचायत समितीच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आली आहे. सिंचन विहिरीच्या बाबतीत सदर कामे खंड न पडू देता सुरू असल्यामुळे व ग्रा.पं. यंत्रणेला ती कामे केवळ हजेरीपत्रक नसल्याने थांबविणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे भविष्यात सदर जुन्या कामाचे मूल्यांकन नाइलाजास्तव नियमित करावे लागून अडचणी निर्माण होणार आहेत; मात्र या गंभीर बाबीचे पं.स. प्रशासनाला काहीही घेणे देणे नसल्याचे चित्र आहे. पावसाळय़ाला सहा आठवडे बाकी असताना १ मे पर्यंंंत हजेरीपत्रक मिळणार नसल्याने शेकडो विकासाचे कामे कसे पूर्ण करावे, हा प्रश्न सर्वच ग्रा.पं. यंत्रणांना पडलेला आहे. दुष्काळग्रस्त भागात म.गां. ग्रारोहयोचे जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे शासनाचे आदेश असताना सुरू असलेली कामे खंडित करण्याचे काम रिसोड पं.स.च्यावतीने सुरू आहे. मात्र पदाधिकारी लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. हजेरीपत्रक न देण्याच्या पं.स.च्या निर्णयामुळे मजुरांना काम नाही व त्यामुळे दामही नसल्यामुळे उपासमारीची वेळ पं.स.ने आणली आहे. सदर योजनेमधील विविध कामाची कुशल भागाची अदायगी सद्य:स्थितीत न करता अकुशल कामाची अदायगी सर्वप्रथम करण्याचे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा या निर्देशाची सर्रासपणे पायमल्ली होत असताना दिसत आहे.