‘निकिता’च्या लग्नाला रिसोड बाजार समितीचा आधार!
By Admin | Updated: May 5, 2016 03:19 IST2016-05-05T02:42:50+5:302016-05-05T03:19:35+5:30
आर्थिक विवंचनेतून वडिलांनी केली होती आत्महत्या.
‘निकिता’च्या लग्नाला रिसोड बाजार समितीचा आधार!
वाशिम: मुलीचे लग्न अवघ्या १0 दिवसांवर असताना, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तिच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. मुलीच्या लग्नासाठी चिंतेने ग्रासलेल्या या कुटुंबाची व्यथा लोकमतने समाजासमोर मांडली आणि मदतीचे हात समोर आले. रिसोड कृषिउत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकार्यांनी लग्नकार्यासाठी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.
रिसोड तालुक्यातील धोडप येथील शेतकरी बबनराव शंकर बोडखे यांच्याकडे केवळ दोन एकर शेती होती. तीन मुली, मुलगा आणि पत्नी असे हे कुटुंब शेतीमध्ये राबून उपजीविका भागवत होते. संसार सांभाळून त्यांनी दोन मुलींचे लग्न केले. मुलगा गणेश नवव्या वर्गात शिकत आहे. त्यांची तिसरी मुलगी निकिता हिचा विवाह कोयाळी खुर्द येथील गोपाळ सिरसाट यांच्याशी ७ मे रोजी ठरला. लग्नाची तयारी झाली, कपडे घेतले, पत्रिकाही छापल्या; मात्र लग्नकार्यातील खर्चाच्या चिंतेतून बबनराव यांनी २७ एप्रिल रोजी रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने बोडखे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. या कुटुंबाची व्यथा लोकमतने समाजासमोर मांडली आणि मदतीसाठी अनेक जण समोर आले.