अधिकारी-पदाधिका-यांनी घेतला योजनांचा आढावा
By Admin | Updated: November 30, 2014 23:59 IST2014-11-30T23:59:01+5:302014-11-30T23:59:01+5:30
वाशिम जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती; मनरेगामधून विविध कामे हाती घेण्याची गरज.

अधिकारी-पदाधिका-यांनी घेतला योजनांचा आढावा
वाशिम : सरकारकडून सर्वसामान्यांच्या हितासाठी राबवल्या जात असणार्या योजनांचा आढावा जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेतून अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेतला.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब मांढरे, सहाय्यक नियोजन अधिकारी एम. बी. डाखोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या सभेमध्ये केंद्र सरकारकडून राबवण्यात येणार्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना(मनरेगा), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान (स्वर्णजयंती ग्राम स्वच्छता), इंदिरा आवास योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी खा. गवळी म्हणाल्या, जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बेरोजगार व मजुरांसाठी मनरेगामधून विविध कामे हाती घेण्याची गरज आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्वरित मोबदला द्यावा, गेली काही वर्षे अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत उपाययोजना कराव्यात अशी सूचना गवळी यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सर्व अधिकार्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.