मध्यम प्रकल्पांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रखडला!
By Admin | Updated: December 31, 2014 01:09 IST2014-12-31T01:09:25+5:302014-12-31T01:09:25+5:30
उंची वाढल्यास पाणीटंचाई होणार दूर : सिंचनाचीही होणार व्यवस्था.

मध्यम प्रकल्पांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रखडला!
नंदकिशोर नारे / वाशिम: जिल्हय़ात तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी एकबुर्जी व अडाण या प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असून, लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा केला; मात्र सदर प्रस्ताव रखडलेले आहेत. या प्रकल्पांची उंची वाढविल्यास बर्याच अंशी पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न निकाली लागू शकतो. वाशिम जिल्हय़ात एकही मोठा प्रकल्प नाही. तीन मध्यम प्रकल्प असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, मालेगाव तालुक्यातील सोनल व कारंजा तालुक्यातील अडाण या प्रकल्पाचा समावेश आहे. यासह १00 लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला एकबुर्जी धरणामधून पाणीपुरवठा केल्या जातो; परंतु एकबुर्जी धरणाची उंची कमी असल्याकारणाने शहराला आवश्यक व मुलबक पाणीपुरवठा होत नाही. धरणाच्या कमी उंचीमुळे शेतीच्या सिंचनाकरितासुद्धा आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. एकबुर्जी उंची वाढविण्याची मागणी शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सदर धरणाची उंची वाढल्यास शहरातील पाणी समस्या तर दूर होईलच शिवाय शेतकर्यांना सिंचानाकरिता व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील उद्योगांना पाणीपुरवठा होऊन मागासलेल्या जिल्हय़ाच्या विकासास चालना मिळेल. तसेच कारंजा तालुक्यातील अडाण धरणाची उंची वाढण्यासंदर्भात जनतेची बर्याच दिवसांची मागणी आहे; मात्र ही मागणीही अनेक दिवसांपासून रखडलेली आहे. अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यामध्ये असला तरी या प्रकल्पातील पाण्याचा लाभ शेजारील तालुक्याला होतो. प्रकल्पाशेजारी असलेल्या २२ गावांमधील लोकांची लिफ्ट एरिगेशनला चालना मिळण्याकरिता या प्रकल्पाचीही वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. सदरच्या प्रकल्पाची उंची वाढवासी व लिफ्ट एरिगेशनच फायदा शेजारच्या तालुक्यासह या तालुक्यातील २२ गावांमधील लोकांना मिळावा याकरिता खा. भावना गवळी यांनी धरणाच्या भिंतीवर आंदोलन केले होते. तसेच सोनल प्रकल्पाची उंची वाढावी या संदर्भात माजी आमदार गजाधर राठोड यांनीही प्रश्न उचलला होता. भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेवरून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.