वन विभागाने कृती आराखडे तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:06+5:302021-09-11T04:42:06+5:30
वाशिम : जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या ...

वन विभागाने कृती आराखडे तयार करा
वाशिम : जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात ९ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्ण्मुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुधीर मैत्रवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते आणि आर्थिक गणित कोलमडते. शेतपिकांचे नुसकान टाळण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करणे आवश्यक असून जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयीचा कृती आराखडा वन विभागाने तयार करावा, अशा सूचना तिवारी यांनी केल्या. यंदा खरीप हंगामात ९५ टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले असून जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची परिस्थिती चांगली आहे. मात्र, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळावे, त्यांना सावकाराच्या दारात जावे लागू नये, यासाठी बँकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही तिवारी म्हणाले. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरणाचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.
पीक कर्ज, अन्न सुरक्षा योजना, शेतकरी आत्महत्या, निराधार योजना अनुदान वाटप, आरोग्य सुविधा, खावटी योजना, कामगारांना अनुदान वाटप, सहकारी मजूर संस्थांचे ऑडिट, गौण खनिज वाहतूक आदी बाबींचा तिवारी यांनी यावेळी आढावा घेतला.