रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य!
By Admin | Updated: May 7, 2016 01:17 IST2016-05-07T01:17:10+5:302016-05-07T01:17:10+5:30
जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही; पैनगंगा नदीवरील जुमडा बॅरेजच्या कामाची पाहणी.

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य!
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून, या प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ग्वाही, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिलीे. पैनगंगा नदीवर वाशिम जिल्ह्यातील जुमडा येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजच्या क्षेत्रीय भेटीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चक्रधर गोटे, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, अमरावतीचे विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता संजय घाणेकर, वाशिम पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अजय कोहीरकर, माजी आमदार विजयराव जाधव, भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष राजू पाटील राजे, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम ना. महाजन यांनी जुमडा बॅरेजची पाहणी केली. ना. महाजन म्हणाले की, शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून, त्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या ११ बॅरेजचे काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले होते. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ११ बॅरेजेसला सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या या ११ बॅरेजमध्ये सुमारे ३३. २६३ दलघमी पाणी साठा होणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर असे ७ हजार ६९0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे; तसेच दोन्ही जिल्ह्यातील ४७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा ना. महाजन यांनी केला. या सर्व बॅरेजमध्ये निर्माण होणार्या पाणी साठय़ाचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी येथील शेतकर्यांच्या कृषी पंपांना तातडीने वीज जोडण्या देण्याबाबत आपण स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ना. गिरीष महाजन यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले की, वाशिम जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी रिसोड तालुक्यातही पैनगंगा नदीवर बॅरेज उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे; तसेच एकबुर्जी धरणाची उंची वाढविण्याची मागणी यावेळी आ. पाटणी यांनी केली.