पोलीस संरक्षणात अडकले ‘सिंचन’
By Admin | Updated: December 17, 2015 02:57 IST2015-12-17T02:31:54+5:302015-12-17T02:57:39+5:30
खंडाळा प्रकल्प : २00 शेतक-यांच्या सिंचनाचा प्रश्न, कॅनॉलवर अतिक्रमण.

पोलीस संरक्षणात अडकले ‘सिंचन’
वाशिम : तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी असूनही केवळ पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याच्या कारणावरून २00 शेतकर्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभागाशी चर्चा केल्यानंतरही हा प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी हतबल झाले. खंडाळा खुर्द येथील प्रकल्प यावर्षी ९५ टक्के भरला होता. सद्यस्थितीत या प्रकल्पात ४९ टक्के पाणी आहे. या प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर अडोळी व खंडाळा शिवारातील जवळपास २00 शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न निगडित आहे. गतवर्षीदेखील हा प्रकल्प ९0 टक्क्याच्या वर पाण्याने तुडूंब भरला होता; मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्याला परवानगी दिली नाही. यावर्षी सद्यस्थितीत या प्रकल्पात ४९ टक्के पाणी असल्याने शेतकर्यांच्या सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र कॅनॉलवर अनेकांनी अतिक्रमण केल्याने सिंचन करण्यात अडथळे येत आहेत. अतिक्रमण हटवून तसेच पाण्याचा दुरुपयोग होणार नाही, म्हणून पाटबंधारे विभागाने पोलीस संरक्षण मागितले आहे. याबाबतची कल्पना शेतकर्यांना दिली. शेतकर्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी सोमवारी या विषयावर चर्चा केली. पोलीस अधीक्षकांना पोलीस संरक्षणाबाबत निवेदन दिले, तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना तातडीने पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. परिणामी, सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली, असा आरोप नामदेव इढोळे यांच्यासह शेकडो शेतकर्यांनी केला.