दुष्काळाच्या छायेतील बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प!
By Admin | Updated: September 30, 2015 01:27 IST2015-09-30T01:27:10+5:302015-09-30T01:27:10+5:30
अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींसह सजग नागरिकांनी एकत्र येऊन घेतला‘अन्नदाता प्रबोधन संकल्प’
_ns.jpg)
दुष्काळाच्या छायेतील बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प!
सुनील काकडे / वाशिम : दुष्काळाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प वाशिमकरांनी घेतला आहे. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांसह नागरिकांनी एकत्र येऊन अन्नदाता प्रबोधन संकल्प या आगळ्यावेगळ्या ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली असून, या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक, मानसिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीपुढे बळीराजा हतबल झाला आहे. नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या अशाच काही शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा कटू निर्णय घेतला. शेतात अहोरात्र काबाडकष्ट करुन अन्नधान्य पिकविणार्या जगाच्या पोशिंद्यावर जीवन संपविण्याची वेळ का यावी, त्याला सक्षमपणे उभे करण्यासाठी काय करता येईल, शेतकर्यांच्या अन्नधान्याला चांगला हमीभाव कसा मिळेल, त्यांची मुलं-बाळं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कशी येतील, या आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर वाशिमच्या जनतेत सखोल विचारमंथन सुरू झाले आहे. त्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग यांसह इतर प्रशासकीय विभागांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचार्यांसह लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र जमून ह्यअन्नदाता प्रबोधन संकल्पह्ण या आगळ्यावेगळ्या ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्यावतीने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विचारमंथन सभा घेण्यात आली. घाम गाळून धान्य पिकविणार्या शेतकर्यांमध्ये उमेद टिकून राहण्यासाठी नेमके काय करता येईल, यावर सभेत सर्वांगाने चर्चा करण्यात आली. सध्या शेतकर्यांना आर्थिक मदतीची नव्हे; तर मानसिक आधाराची गरज आहे. शेतीसाठी सिंचनाची प्रभावी सोय आणि त्याने पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी आत्महत्यांना आळा बसेल, असा सूर यावेळी उमटला. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारीदेखील उपस्थितांनी दर्शविली. शेतकर्यांची दैनावस्था पाहूनही गप्प बसणार्या समाज उशिरा का होईना, जागा झाल्याने मानसिकदृष्ट्या खचलेला शेतकरी निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून सन्मानाने उभा राहू शकेल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
शेतकर्यांसाठी जिल्हाधिकार्यांचे दालन खुले
प्रशासकीय पातळीवर विविध प्रकारची कामे करून घेताना शेतकर्यांची दमछाक होते. योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतीसंदर्भातील कागदपत्रे मिळविताना विलंब होतो. अशी कोणतीही समस्या असल्यास शेतकर्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. त्यांच्यासाठी आपले दालन नेहमी खुले राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
बळीराजाच्या उत्थानासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या काही दिवसांत तहसील, मंडळ आणि ग्रामस्तरावर प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करून शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. यासाठी कृषिसेवक, कृषी सहायक, तलाठी, मंडळ अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती कृषिविकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी दिली.