पालकांनो सावधान, लहान मुलांना जडतोय दंतविकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST2021-08-24T04:45:13+5:302021-08-24T04:45:13+5:30
वाशिम : गोड खाद्यपदार्थांचे अतिसेवन, ब्रश नियमित न करणे, ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव आदी कारणांमुळे लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण ...

पालकांनो सावधान, लहान मुलांना जडतोय दंतविकार!
वाशिम : गोड खाद्यपदार्थांचे अतिसेवन, ब्रश नियमित न करणे, ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव आदी कारणांमुळे लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तपासणीतून समोर येत आहे.
“दात चांगले तर आरोग्य चांगले,” असे म्हटले जाते. दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत कुणीही फारसे जागरूक नसल्याने मुलांच्या दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढत आहे. चॉकलेट्स, गोड पदार्थ, चिप्स आणि जंकफूड अशा पदार्थांचे अधिक सेवन शरीरासाठी नुकसानकारक असते. या पदार्थांमुळे आजारांना निमंत्रण मिळते. तोंडावाटे अन्न शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दात, जीभ, लाळग्रंथी हे तोंडातील अवयव अन्नाच्या अधिक संपर्कात येतात. या अवयवांची जितकी काळजी घेतली जाईल, तितके मुखआरोग्य चांगले राहते. गोड, चिकट व कडक पदार्थांमुळे दातांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. गोड पदार्थांमधील शर्करा, अर्थात कार्बोहायड्रेट्स दात खराब करणाऱ्या जंतूंसाठी पोषक असतात. गोड पदार्थ खाल्न्ल्यानंतर कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे स्वच्छ झाले नाहीत, तर दात किडण्यास प्रारंभ होतो. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करणे, खाल्ल्यानंतर चूळ भरणे, दाताला हानिकारक असलेल्या पदार्थांचे सेवन नियंत्रणात ठेवणे या गोष्टी नियमित केल्या तर दातांचे रक्षण करता येईल, असा सल्ला दंतरोग तज्ज्ञांनी दिला. ३ ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे. साधारणत: ७० टक्के बालकांच्या दातांना कीड लागत असल्याचे दंतरोग तज्ज्ञ सांगतात.
.................
अशी घ्यावी दातांची काळजी
तोंडातील जिवाणू गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात. ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात.
लहान मुलांना गोड पदार्थ जास्त प्रमाणात खायला देणे टाळावे. कोणताही गोड खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरण्याची सवय बालकांना लावावी.
बालकांचा सकाळ व संध्याकाळ असा दोन वेळा नियमित ब्रश करून घ्यावा.
ब्रश काही महिन्यांनी बदलावा. हिरड्यांवरून हलक्या हाताने पेस्ट चोळून मसाज करावा. रक्ताभिसरण सुधारून दातावरील कीटक साफ होतात.
दातांच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजाराला ‘पायरिया’ असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.
00