अल्प पाण्यात फुलविली पपईची बाग
By Admin | Updated: June 6, 2015 01:02 IST2015-06-06T01:02:03+5:302015-06-06T01:02:03+5:30
तांदळी येथील शेतक-याची यशोगाथा; शासकीय अनुदान न घेता घालून दिला आदर्श.

अल्प पाण्यात फुलविली पपईची बाग
कोंडाळा महाली (जि. वाशिम) : पाणीटंचाईच्या काळात कमी पाण्यावर तांदळी शेवई येथील शेतकर्याने पपईची बाग फुलविली आहे. विशेष म्हणजे या शेतकर्याने शासनाच्या कृषी विभागाचे अनुदान न घेता स्वखर्चातून पपईची बाग फुलवून, इतर शेतकर्यांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे. तांदळी शेवई येथील माजी उपसरपंच शेतीनिष्ठ कास्तकार दादाराव नरवाडे यांनी पाणीटंचाईच्या काळात सुध्दा ठिंबक सिंचनाव्दारे कमी पाण्यामध्ये २ एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड करुन जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नातून जिद्द, चिकाटीव्दारे त्यांनी परिस्थितीसमोर हार पत्करली नाही. दादाराव नरवाडे यांनी सोलापूर येथून पपईचे रोपे आणून ११ फेब्रुवारी २0१५ रोजी रोपे लावली. रोपाचा खर्च २२ हजार रुपये कमी खर्चाचा चायना ठिंबक नळया पाईप खर्च १0,000 रुपये तसेच रोही, रानडुकर, हरिण वगैरे वन्य प्राण्यापासून तार कंपाऊंड खर्च ४५ हजार रुपये रासायनिक खताचा खर्च १५ हजार रुपये व इतर खर्च १५ हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांच्या जवळ त्यांनी खर्च केलेला आहे. सध्या त्यांची पपई फुल व फळ धारणेच्या अवस्थेमध्ये आहे. पावसाळा लांबला तर पाण्याचे अतिरिक्त नियोजनही त्यांनी केले आहे.