...अन् अधिकाऱ्यांनीही हाती घेतला झाडू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:27+5:302021-09-25T04:45:27+5:30

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात २४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्व ...

... Other officers also took the broom! | ...अन् अधिकाऱ्यांनीही हाती घेतला झाडू!

...अन् अधिकाऱ्यांनीही हाती घेतला झाडू!

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात २४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. यादरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही हाती झाडू घेत स्वच्छतेच्या या महायज्ञात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेत आज सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मापारी, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, उपशिक्षण अधिकारी डाबेराव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करुन उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी केले. माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. शाहीर के. के. डाखोरे यांनी तुझं गावच नाही का तीर्थ हे तुकडोजी महाराजाचे भजन गाऊन स्वच्छतेचा संदेश दिला. सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनोने यांनी आभार प्रदर्शन केले.

.................

जि.प. परिसरात स्वच्छता व कचरा संकलन

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निकम यांच्या नेतृत्वात सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले. परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर टाकावू कचऱ्याचे संकलन यावेळी करण्यात आले.

...........

‘सिंगल युज प्लास्टिक’ न वापरण्याचा निर्धार

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालय परिसरात आज एकाच दिवशी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापुढे ‘सिंगल युज प्लास्टिक’चा वापर न करण्याचा निर्धार केला. तशी शपथही घेण्यात आली.

......................

ग्रामसेवकांसोबत आज स्वच्छता संवाद

जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर सुरू झाला असून २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सर्व सरपंच व ग्रामसेवकांसोबत स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम हे ऑनलाईन पद्धतीने ४९१ सरपंच व ग्रामसेवकांसोबत संवाद साधतील. याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून पत्र पाठविण्यात आले आहे.

Web Title: ... Other officers also took the broom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.