नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा केवळ सोपस्कार.
By Admin | Updated: April 16, 2015 01:29 IST2015-04-16T01:29:12+5:302015-04-16T01:29:12+5:30
पाहणीनंतर सादर होईल अंतिम अहवाल ; अवकाळी पाऊस सुरूच.

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा केवळ सोपस्कार.
वाशिम : जिल्ह्यात ९ ते १२ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे विशेषत: फळबाग उत्पादक शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात ७७0 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ८ एप्रिलपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नेमके किती शेतकर्यांच्या पिकांचे व क्षेत्रफळाचे नुकसान झाले, याचा अहवाल अद्याप सादर करण्यात आला नसून, केवळ नुकसान पाहणीचा सोपस्कार पार पाडून प्राथमिक अंदाज वर्तविले जात आहेत. ९ ते १२ एप्रिल दरम्यानच्या अवकाळी पाऊस व वादळी वार्याने जिल्ह्यातील ७७0 हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना अवकाळी फटका दिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला. त्यामध्ये वाशिम तालुक्यात १२५ हेक्टर, रिसोड २३२ हेक्टर, कारंजा ५0, मानोरा ५0 हेक्टर, मालेगाव १00 हेक्टर, मंगरुळपीर २0८ असे एकूण ७७0 हेक्टरवरील रब्बी पीक, भाजीपाला, आंबा, फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे १0९ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या भागातील बर्याच नुकसानग्रस्तांना अद्याप भेट देण्यात आली नाही. कारंजा तालुक्यातील १0९ घरांची पडझड झाली, तर कांदा व केळी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या भागात तहसीलदार चेतन गिरासे यांच्या चमूने भेट दिली असून उर्वरित पाहणी सुरू आहे. मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या चार गावांतील पंचनामे केवळ पूर्ण झाले असून, उर्वरीत गावांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. यासंदर्भात संबधितांशी संपर्क केला असता सर्व गावचे पंचनामे करून अंतिम अहवाल आल्यानंतर नुकसानाच्या निश्चितीबाबत माहिती हाती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.