शिरपूरच्या अडोळ प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठा!
By Admin | Updated: September 20, 2016 01:10 IST2016-09-20T01:10:53+5:302016-09-20T01:10:53+5:30
रब्बी हंगामावर संकट; रिसोड व शिरपूरसाठी पाणी ठेवले जाणार राखून.

शिरपूरच्या अडोळ प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठा!
शिरपूर जैन (जि. वाशिम), दि. १९- यंदा दमदार स्वरूपात झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील बहुतांश धरणांनी १00 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे सिंचनाकरिता पाणी राखून ठेवत रिसोड आणि शिरपूर जैनला ज्या अडोळ प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो, त्यात आजमितीस केवळ ४0 टक्के पाणीसाठा झाला आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन धरण न भरल्यास भविष्यात सिंचनाच्या प्रश्नासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिरपूरपासून १0 किलोमीटर अंतरावर अडोळ प्रकल्प वसलेला आहे. या प्रकल्पातून वाघी, बोराळा, खंडाळा, पार्डी, रिठद, येवती, ढोरखेडा यासह इतर गावातील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. सोबतच रिसोड आणि शिरपूर या दोन गावांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. यावर्षी जिल्हय़ात सर्वदूर मोठय़ा प्रमाणात पाऊस कोसळला; मात्र शिरपूर, करंजी, शेलगाव, शिरसाळा, खंडाळा या अडोळ परिसरातील गावामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. शिरपूर येथे केवळ ४७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, प्रकल्पामधील पाणीसाठय़ात योग्य प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे आज रोजी प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठय़ाची नोंद आहे. इतक्या कमी प्रमाणात प्रकल्पात जलसाठा असून येत्या काही दिवसात परतीचा पाऊस न झाल्यास परिसरातील शेतकर्यांचा रब्बी हंगाम निश्चितपणे धोक्यात येऊ शकतो. तसेच प्रकल्पातून रिसोड व शिरपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असतो, त्यावरही बहुतांशी परिणाम होण्याचे संकेत आहेत.