जिल्ह्यातील केवळ १२ टक्के ज्येष्ठांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:59+5:302021-03-25T04:39:59+5:30
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २३ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ हजार ४१० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला ...

जिल्ह्यातील केवळ १२ टक्के ज्येष्ठांनी घेतली लस
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २३ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ हजार ४१० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १७४ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ११ हजार ३२५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तसेच १,९१० व्यक्ती उपचाराखाली आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी शासकीय केंद्रात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात १ मार्चपासून २५ मार्चपर्यंत केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारग्रस्त मिळून २९२५७ जणांनी लस घेतली आहे. त्यात ६० वर्षे वयावरील नागरिकांची संख्या २२ हजारांच्या जवळपास आहे. प्रत्यक्षात ६० वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
--------------
जिल्हाधिकाऱ्यांची जनतेला साद
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागांतील अनेक रुग्ण कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यानंतरच रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यात काही रुग्ण चिंताजनक परिस्थितीत दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह साधा, ताप, खोकला, अशक्तपणा, सर्दी, हगवण, मधुमेह, फुप्फुसांचे आजार, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तातडीने कोरोना चाचणी करावी, तसेच कोरोनाची लस सुरक्षित असून, ती ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्तांनी घ्यावी, अशी साद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
---------------
चाचणी, लसीकरण वाढविण्यासाठी सरपंचांना पत्र
जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांतच पाच हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातही जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तथापि, ग्रामीण भागांतून कोरोना चाचणी करण्यासह लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सरपंचांना एक पत्र देऊन त्यांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६० वर्षे वयाच्या दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीला सक्रिय करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.