बागायती जमिनीचा लाभ नाही
By Admin | Updated: February 23, 2015 02:11 IST2015-02-23T02:11:13+5:302015-02-23T02:11:13+5:30
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.

बागायती जमिनीचा लाभ नाही
वाशिम : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत २00६-0७ ते २0१४-१५ या दरम्यान एकाही लाभार्थी कुटुंबाला बागायती जमीन मिळाली नसल्याची माहिती आहे. याच दरम्यान १९५ लाभार्थी कुटुंबाला ७५५ एकर कोरडवाहू जमिनीचा लाभ मिळाला आहे. गोरगरीब व भूमिहीन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीनांना दोन एकर बागायत, तर चार एकर कोरडवाहू जमीन दिली जाते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५0 टक्के अनुदान, तर उर्वरित ५0 टक्के रक्कम १0 वर्षासाठी बिनव्याजी स्वरूपात दिली जाते. पात्र लाभार्थींना जमीन देण्यासाठी शासनाकडून शासकीय दरात प्रथम जमीन खरेदी केली जाते. जमीन विकण्यासाठी कुणी तयार झाला, तर लाभार्थींना जमीन दिली जाते. २00४ ते २0१४ या १0 वर्षात सहा वेळा कोरडवाहू जमीन उपलब्ध झाली तर चार वेळा कोणतीच जमीन उपलब्ध झाली नाही. २00४ पासून बागायती जमीन उपलब्ध झाली नाही. परिणामी, याचा लाभ लाभार्थी कुटुंबाला मिळाला नाही. कोरडवाहू जमीन उपलब्ध झाल्याने जिल्हय़ातील १९५ भूमिहीन शेतकर्यांना सदर कोरडवाहू जमिनीचा लाभ देण्यात आल्याची नोंद विशेष समाजकल्याण विभागाच्या दप्तरी आहे.