नवनिर्मित वाशिम - शेलूबाजार रस्त्याची वर्षभरातच दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST2021-09-10T04:50:26+5:302021-09-10T04:50:26+5:30
जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या वाशिम - शेलूबाजार मार्गाला दोन वर्षांपूर्वी प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण ...

नवनिर्मित वाशिम - शेलूबाजार रस्त्याची वर्षभरातच दैना
जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या वाशिम - शेलूबाजार मार्गाला दोन वर्षांपूर्वी प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले आणि वर्षभरापूर्वीच या रस्त्यावर वाहतूकही सुरू झाली. आता या मार्गावर शेलूबाजारमार्गे कारंजा, अमरावती, नागपूर आणि यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. शिवाय वाशिम - मालेगाव - अकोला रस्त्याची अवस्था वाईट असल्याने वाशिम येथून अकोलाकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका, मालवाहू वाहने याच मार्गाचा अवलंब करतात. या मार्गावरील पिंप्री अवगण ते चिखलीपर्यंतचा रस्ता हा वाईल्ड लाईफच्या अडथळ्यामुळे एक पदरीच करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कडा त्यावेळी गिट्टीने दबाई करुन भरल्या गेल्या होत्या, परंतु एक पदरी रस्त्यावर वाहने वेगात चालविण्यासह समोरच्या वाहनाला मार्ग देण्यासाठी रस्त्याच्या खाली उतरवली जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतची खडी उखडून कमी झाली. तर पावसामुळे रस्त्याच्या कडा खोलगट झाल्या आहेत. आता एक पदरी रस्त्यावर दोन वाहने समाेरासमोर आल्यास बाजू घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
-----------
पिंपरी ते गोगरीदरम्यानच्या पुलाची दुरवस्था
वाशिम - शेलूबाजार मार्गावर पिंप्री खुर्द ते गोगरी फाट्या दरम्यानच्या पुलाजवळ पावसाच्या पाण्यामुळे मोठी दरी पडली आहे. एखाद्या वाहनचालकाने वेगात बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंप्री ते चिखली झोलेबाबा गावापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा भरणे गरजेचे आहे.